प्रस्तावना

तंबाखूचे दुष्परिणाम

वैद्य शंकरराव गोविंदराव माने यांचा व माझा परिचय अगदी अलीकडे झाला. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथशतकाची भव्य सत्यकथा मी दोन महिन्यांपूर्वी ऐकली. अल्पशिक्षित पण अत्यंत सुसंस्कृत अशा या व्यक्तीची तत्त्वनिष्ठा मला आदरणीय वाटली. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी सद्गुरू श्री.ह.पां.कोटणीस महाराज सांगली यांचा अनुग्रह घेऊन ज्ञानयोगाला प्रारंभ केला. नंतर १५ वर्षे साधना; हजारो ग्रंथांचे अहोरात्र वाचन व मनन करून त्या ग्रंथांतून दक्षतापूर्वक, क्षणश: व कणश: ज्ञान-रेणु टिपून आता त्यांनी एक मोठा रांजण भरून ठेविला आहे. या रांजणांतील ज्ञानधनाचा महाराष्ट्राने व भारताने यथेष्ट उपयोग करावा अशी त्यांची निवेदना आहे. त्यांना शब्दशारदेचे शृंगार नको आहेत. विद्वत्तेची विभूषणे विखुरण्याची हौस त्यांना नाही. त्यांना हृदयपालट, चित्तजागृती व आंतरशुचिता हवी आहे. त्यांचे लेखन ग्रंथकर्तृत्वाच्या अहंकाराने जन्मास आले नाही. जीवनाच्या पुनर्रचनेसाठी त्याचा अवतार आहे. प्रदीर्घ तत्त्वनिष्ठेच्या तेजाने त्यांच्या ग्रंथशतकाला एक विलक्षण उजळा चढला आहे. समाजाला जाग देण्याची, सुवृत्त ठेवण्याची व पुनीत करण्याची शक्ती या ग्रंथ मालेच्या ज्ञानगंधांत नि:संशय आहे. मालेतले प्रत्येक पुष्प विशिष्ट आकाराचे व प्रकाराचे आहे. प्रत्येकाचा सुगंध वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येकाचे दर्शन नवीन पाऊलवाट उजळणारे आहे. पहिले पुष्प एका सार्वत्रिक व्यसनाच्या निर्मूलनासाठी फुलत आहे. नैतिक पुनर्रचना हेच विश्वशांतीचे बीज आहे. मानवमात्राने, स्वत:च्या प्रयत्नाने, स्वत:चा जागृती-जात पुनर्जन्म याच जन्मात सिद्धविला पाहिजे. द्विजत्व हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. जीवनाच्या मूलभूत तृष्णामध्ये विसंगती निर्माण झाल्यामुळे मनुष्य व्यसनाधिन होतो. व्यसनाधीन अवस्थेत देखील सुखोत्पत्ती होत असताना त्याच्या अंत:करणात एक पाल चुकचुक करीत असते. ती म्हणते, “हा आत्मघात आहे; सुख नव्हे - हा सुखाचा आभास असून हालाहाल विषयाचे घुटके मी गिळीत आहे.” आंतरजीवनातील विसंगती व मूलभूत तृष्णांमधले आंतर-विरोध नष्ट झाल्याशिवाय व केल्याशिवाय, व्यसनाची पकड सुटू शकत नाही. व्यसनाशी सन्मुख सामना देणे हिताचे नसते. गनिमीकाव्याने त्याला चेचले पाहिजे. आपली चित्तशक्ती दुसऱ्या कोठेतरी केंद्रित करावी. एखादे ध्येय, एखादी उपासना, एखादे महत्कार्य अंगीकृत करावे व इतक्या परिपूर्णतेने त्यामध्ये समरस व्हावे की व्यसन विषयाचा आठव देखील होणार नाही. व्यसनाचा आठव राहता कामा नये. व्यसनाशी झगडताना हा आठव वाढत राहतो व त्यामुळे आपली चित्तशक्ती व्यसनाला आपोआप मिळत राहते. व्यसनाव्यतिरिक्त अन्य कल्पनेला पूर्णत: आत्मनिवेदन करणे ही प्रक्रिया कोणत्याही व्यसनाला ताब्यात आणू शकते. एखादी संस्था किंवा एखादा ध्येयवाद आत्मसात करावा, पूर्णपणे त्या स्थंडिलावर आत्मनिवेदन करावे म्हणजे क्रमश: कोठलेही व्यसन आपोआप गळून पडते! समर्पित जीवन असेल तरच ते निर्व्यसनी होऊ शकते व राहू शकते. ही आंतरजागृती, हे समर्पण सिद्धविण्याला अनुकूल वातावरणाची आवश्यकता असते. विषय, ज्ञानातच आले नाहीत, की त्यांचे ध्यान होत नाही, ध्यान नसले म्हणजे संगति जडत नाही व संगती नसली की वासना स्थिरावत नाहीत. व्यसन-हेतुक विषयांचं अभाव करणे, त्यांचे उपयोगाविरुद्ध कायद्याचे नियंत्रण आणणे या गोष्टी कराव्याच लागतात. कारण त्या केल्याशिवाय अनुकूल वातावरण निर्माण होत नाही. कायद्याने दारुबंंदी अखिल भारतात लवकरच होत आहे. सर्व मानव समाजाता प्रत्येक राष्ट्रात ती झाली पाहिजे. हृदयपालट व अनुकूल वातावरण ही एकसमयाने निष्पन्न होत राहिली पाहिजेत. तरच मानवमात्र निर्व्यसनी होऊ शकेल. श्री.शंकरराव माने यांनी हे नैतिक आंदोलन अवश्य सुरू करावे व महाराष्ट्राने आपली अमोघ शक्ती त्या आंदोलनाला उपलब्ध करून द्यावी. त्यांची शंभर हस्तलिखिते न्याहळल्यावर श्री.शंकररावांच्या ज्ञाननिष्ठ कर्मयोगाबद्दल मला कौतुकादर वाटत आहे. प्रत्येक हस्तलिखित रोचक, उद्वोदक व विमोचक आहे. ही ज्ञानगंगा शतधारानी व शतमुखांनी महाराष्ट्रीय जनमनाला जागृत करण्यासाठी अवतरत आहे. श्री.शंकररावांच्या भगीरथ प्रयत्नांचे सर्वांनी सुवर्णफुले उधळून अभिनंदन करणे अमुचित आहे. धगधगीत एकनिष्ठेने आपण हे नैतिक आंदोलन सुरू केले पाहिजे. ही सर्व हस्तलिखिते मुद्रित करू या; त्यांची प्रखर व प्रभावी शिकवण आचरणात आणू या; पण स्वत:पासून सुरुवात करू या.

- धुं. गो. विनोद

शांति: शांति: शांति:

न्या. विनोद यांचे अभिनंदन न्या. विनोद संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून व उत्तर ध्रुव प्रदेशात प्रत्यक्ष संचार करून, परत भारतात आल्यावर आपल्या राजधानीत दिल्ली येथील कॉन्स्टिटुशन क्लबमध्ये त्यांचा भव्य महोत्सवात सत्कार झाला. राष्ट्राध्यक्ष डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी व पं.जवाहरलाल नेहरु यांनी आंतरराष्ट्रीय व जागतिक परिस्थितीबद्दल न्या.विनोद यांचेपाशी अनेकवेळा चर्चा केली. मागील चित्रात न्या.विनोद, राष्ट्रवादी राजेंद्रप्रसाद यांना बहात्तर देशांतल्या नैतिक श्रेणीबद्दल आपले अनुभव सांगत आहेत. दोघेही अध्यात्मिक चर्चेत रंगले आहेत. मनुष्यमात्राची नैतिक व आध्यात्मिक श्रेणी उच्चतर करण्यासाठी न्या.विनोद यांनी आपले जीवन पूर्णपणे समर्पित केले आहे. भारताच्या या विश्वविख्यात महान् द्रष्ट्याचे आशीर्वाद व सहाय्य आमच्या पहिल्याच ग्रंथास लाभल्यामुळे आमचे बल सहस्रपट वाढले आहे. आजच्या जगातील सर्वश्रेष्ठ नेते व शास्त्रज्ञ यांच्याशी न्या.विनोद यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांच्यातर्फे आम्हाला एकप्रकारे जागतिक शक्ती लाभली आहे. न्या.विनोद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नैतिक जागृतीची प्रत्यक्ष चळवळ व आंदोलन भारतव्यापी करण्याची नम्र महत्त्वाकांक्षा धरीत आहोत. ही ग्रंथमाला मनोरंजनासाठी किंवा केवळ बौद्धिक चर्चेसाठी प्रकाशित होत नाही. चारित्र्यपरिवर्तन हा आमचा नम्र उद्देश आहे. न्या.विनोदांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तिशिखरावर आरूढलेले सिद्ध-सत्पुरुष आपली आशीर्वाद शक्ती मला देत आहोत. ही एकच गोष्ट मला दैवी बल मिळत असल्याची साक्ष होय! करिता न्या. विनोद यांचे चरणी शतश: नमन असो.

- धुं.गो.विनोद

-----------------

पुस्तकाचे नाव: तंबाखूचे दुष्परिणाम

लेखक: वैद्य शं.गो. माने प्र

स्तावना: न्यायरत्न धुं.गो. विनोद, एम्.ए.पी.एच्.डी. दर्शनालंकार

लोककल्याण-ज्ञान-ग्रंथमालेख, भारताचे महान द्रष्टे, तत्त्वज्ञ-संत व महानुभाव, न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद, एम्.ए.पी.एच्.डी. दर्शनालंकार, शांतिसचिव - विश्वशांति परिषद (टोकिओ, जपान), उपाध्यक्ष - शाश्वत विश्वधर्म संस्था (न्यूयॉर्क, अमेरिका), फेलो - रॉयल सोसायटी ऑफ आर्टस्, लंडन यांचा शुभ-आशीर्वाद

संपादक,

शं.गो. माने

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search