प्रस्तावना

माधव निदान


उपन्यास

आपल्या आर्यवैद्यकाचे दिव्य व भव्य स्वरूप अवगत नसल्यामुळे आज त्याचा आपण ‘उद्धार’ केला पाहिजे अशी भूमिका स्वीकारली जाते. या क्षणापर्यंत आयुर्वेदाची राजतरंगिणी अव्याहतपणे स्वत:च्या चिरंतन शक्तीने समृद्ध होत राहिली आहे. एखाद्या कालखंडात काही मानवांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले तरी ती केव्हाही नष्ट होणार नाही. आयुर्वेदश्रुति ही एक स्वयंप्रभ ज्योति आहे. तिचे अन्तसत्य अत्यंत प्रभविष्णु आहे. कालाची कराल दष्ट्रा आयुर्वेदविद्येला केव्हाही स्पर्श करू शकणार नाही.

 

आर्यांची आयुर्विद्या ही एक सनातन सत्याची आकाशगंगा आहे. तिच्या तेजाखाली मानवाने स्वत:स पुनीत व अमर करून घ्यावयाचे आहे. अज्ञान-जन्य अहंकाराने तिचा उद्धार करू पाहाणे ही विपर्ययाची अतिकोटि होय. ‘विपर्ययो मिथ्याज्ञानं अतद्रूपप्रतिष्ठम्।।’ (पतंजलि योगसूत्रे, समाधि पाद) वैदिक आयुर्वेदविद्या, भारतीय जीवनाची व विश्वजीवनाची स्वास्थ्यशांतीच्या अधिष्ठानावर पूर्णतया पुनर्रचना करण्यास समर्थ असलेली एक शिवशक्ती आहे. भारताने व अखिल मानव-कुलाने या शिव-शक्तीची उपासना करून ‘स्वत:चा’ उद्धार करून घ्यावयाचा आहे. तिचा उद्धार करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. हा प्रमत्त दृष्टीकोन बदलून यथार्थ व विनत अशा भावनेने आयुर्विद्येकडे पाहाण्यास आपण प्रथम प्रवृत्त झाले पाहिजे. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत दोनशे सदुसष्ट (२६७) कोट रुपये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अन्वेषणाकरिता (Research) देण्यात आले आहेत. त्यातील दोनशे साठ कोटी आंग्लवैद्यकाच्या संशोधनाकरिता असून उरलेल्या सात कोटींमध्ये दुसर्‍या सर्व वैद्यक पद्धती व त्यांचे संशोधन होणार आहे. आयुर्वेद संशोधनाला या सात कोटींपैकी अत्यल्प भाग मिळण्याचा संभव आहे. स्वराज्याच्या कालात आयुर्वेदविद्या इतकी उपेक्षित असावी यापेक्षा अधिक उद्वेगजनक घटना ती कोणती? राजाश्रयाप्रमाणे स्वराज्याश्रयदेखील स्वयंसिद्ध विद्येला व स्वयंप्रभ प्रतिभेला नि:सत्व व निस्तेज करीत असतो असे मानून आयुर्वेदाच्या पुरस्कर्त्यांनी स्वत:च्या अंत:शक्तीवर विसंबणे सर्वथैव योग्य ठरेल अथवा खर्‍याखर्‍या स्वराज्याची सिद्धीच अजून व्हावयाची आहे, असेही म्हणता येईल. क्रियासिद्धी: सत्वे भवति महतां नोपकरणे। आयुर्वेदाचे अर्किचन उपासक, दृढसत्व असल्यामुळे बाह्यसाधनांपेक्षा त्यांची अंत:शक्तीच क्रियासिद्धी घडवून आणील.


आयुर्वेद व अतीद्रिंयज्ञान

आयुर्वेद हा जीवनाचा ‘वेद’ आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान इत्यादी लौकिक प्रमाणांनी जेव्हा व जेथे कोठलाही उपाय सापडत नाही तेव्हा व तेथे ‘अलौकिक’ असे उपाय जो ग्रंथ सुचवितो त्याला ‘वेद’ असे म्हणतात. ही सायणाचार्यांची व्याख्या प्रसिद्धच आहे. प्रत्यक्षेण अनुमित्या व यस्तूपायो न बुध्यते। एतं विंदति वेदेन-तस्मात् वेदस्य वेदता। आयुर्वेद हे केवळ रोग-शास्त्र नाही, ते एक योग-शास्त्र आहे. तो एक वेद आहे. कारण त्यात जीवन-संरक्षा व समृद्धि यांचेबद्दल अलौकिक उपाय सांगण्यात आले आहेत. आयुर्वेद म्हणजे आयुष्याबद्दल अ-लौकिक उपाय प्रकटविणारे शास्त्र. मानसशास्त्र, अतिमानसशास्त्र व अतींद्रियशास्त्र ही तिन्ही क्षेत्रे आयुर्वेदाच्या कक्षेत अंतर्भूत होतात. न्याय, सांख्य व योग या दर्शनात या तीन क्षेत्रांबद्दल मौलिक विचारणा झाली असून वैशेषिक, पूर्व-मीमांसा व उत्तर-मीमांसा किंवा वेदांत या दर्शनातदेखील या तिन्ही शास्त्रांबद्दल अत्यंत सूक्ष्म विवेचन झालेले आढळते. दर्शनविद्येच्या कक्षेपलीकडे अगदी आजचेदेखील पाश्चिमात्य विज्ञान विशेष गेलेले नाही; असे साधार म्हणता येईल; यात स्वदेश-भक्ती नसून केवळ सत्य-निर्देश आहे. चरक व सुश्रुत हे दोन ग्रंथ दर्शनविद्येच्या कालखंडांत अवतीर्ण झाले होते. स्वत: चरकाने व सुश्रुताने दार्शनिक तत्त्वज्ञानाचे विवेचन आपल्या ग्रंथात अत्यंत सुसूक्ष्म व सखोल पद्धतीने केले आहे. त्रिदोष, त्रिधातू व मानसशास्त्र याबद्दलचे उल्लेख चरकामध्ये अनेक ठिकाणी येतात. वात किंवा वायु हा मनस् तत्त्वाचा प्रणेता आहे. मन, इंद्रिये व ज्ञान तिन्ही अतींद्रिय आहेत याचाही स्पष्ट उल्लेख चरकात आहे. अतींद्रियम् पुनर्यन: सत्त्वसंज्ञकम् चेतस् अध्दा हि विदितम् ज्ञानम् इंद्रियाणाम् अतींद्रियम्। यै रेव तावत् इंद्रियै: प्रत्यक्षम् उपलभ्यते तानि एव संति च अप्रत्यक्षाणि।। मन अतींद्रिय आहे. वायु त्याचा प्रणेता. तोदेखील अर्थात् अतींद्रिय आहे. पित्त व कफ देखील तत्त्वत: अतींद्रियच आहेत. वायु: प्रणेताच मानस:। असे चरकाने स्पष्ट म्हटले आहे. वायु प्रत्यक्ष भागवान आहे; वायु हा तंत्र-यंत्रधर आहे. वायु म्हणजे प्राण. हे सर्व चरक संहितेतले उल्लेख मानसशास्त्र, अतिमानसशास्त्र व अतींद्रियशास्त्र, या शास्त्राचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व तत्त्वगर्भ आहेत. प्रज्ञा-अपराध, पूर्वापराध, असात्म्य-इंद्रियार्थ-संयोग, सम्यक्-संयोग ही आयुर्वेदातील मौलिक गृहीत कृत्ये, मानस व अतिमानस शास्त्राच्या उपयोगाची आवश्यकता, अपरिहार्यता दर्शविणारी आहेत. “वायु जिकडे नेईल तिकडे, मेघांप्रमाणे, पित्त व कफ, मल व धातु हे जात असतात” असे सांगणारा सुश्रुतांतील खालील श्लोक प्रसिद्धच आहे. पित्तं पंगु कफ: पंगु: पंगवो मल धातव:। वायुना यत्र नीयते तत्र वर्षंति मेघवत्।। वायुजन्य मन हे, पित्त व कफ यांच्यावरही निर्णायक संस्कार करीत असतो. सर्व रोगांचा मनस्तत्त्वाशी गाढ संबंध आहे. हा संबंध जन्य-जनक स्वरूपाचा आहे. रोगाचे एक प्रमुख कारण रुग्णाची मन:स्थिती हे होय. मन म्हणजे वायू. मन व वायू यांचा सघन, समवाय-संबंध आहे. सायको-सोमॅटिकस् ही अगदी काल-परवा उदित झालेली अमेरिकेतली अभिनव चिकित्सा-पद्धती चरकाला अविज्ञात नव्हती हे नि:संशय. मनाचे अतींद्रिय स्वरूप, हे आयुर्वेद प्रणेत्याचे आद्य गृहीत कृत्य आहे. आयुर्वेदीय संशोधनात भविष्यकाली या क्षेत्रासंबंधी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत. मानस व अतिमानसशास्त्र आयुर्वेदात अंतर्भूत आहेच. या दृष्टीने प्रयोग केल्यास त्याचे परिणाम मानवी जीवनावर अणु-शक्तीपेक्षाही अधिक क्रांतिकारक होतील अशी मला खात्री वाटते. तिसर्‍या पंचवार्षिक योजनेत तीनशे कोटी रुपये या कार्याला मिळाले तर एकंदर मानवी जीवनाची स्वास्थ्य-निष्ट पुनर्स्वना सुशक्य होईल. स्वप्नावरून रोग व रोगनिदान सांगण्याच्या पद्धतीचा उल्लेख वाग्भटाने केलेला आहे. नाडी-परीक्षेतदेखील अतींद्रिय स्फूर्तीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. वैदिककाली नाडीपरीक्षा प्रचारात नसावी, असे एक मत आहे. पण औषधांचे त्रिविध प्रकार दिव्य, पार्थिव, औदक, ऋग्वेदात निर्दिष्ट आहेत; त्रिदोष-पद्धती वैदिक आहे; म्हणून नाडी-विज्ञानहि वैदिक आहे; असे मानणाराही एक पक्ष आहे. भारतीय पद्धतीचे, अंगुली-त्रयाचा स्पर्श करून त्रिदोष-प्रकोप निश्चित करणारे नाडीविज्ञान दुसर्‍या कोणत्याही देशात पूर्वी किंवा आता प्रचलित असल्याचे प्रमाण उपलब्ध नाही. जिव्हा-परीक्षा, नेत्र-परीक्षा, हृदय-परीक्षा, हस्तपाद-परीक्षा इत्यादी परीक्षा चीन, तिबेट, हवाई बेटे येथे विशिष्ट स्वरूपात प्रचलित होत्या व आजही आहेत असे मला आढळले. उत्तर ध्रुव प्रदेशात शीर्षमध्याचे अवघ्राण करून रोगनिदान केले जाते व ते अगदी अचूक असते असे मला तत्रस्थ आदिवासींकडून समजले. श्री दत्तराम यांचा नाडीदर्पण हा लहानसा प्रसिद्ध ग्रंथ येथे उल्लेखनीय आहे. वात, पित्त व कफ यांचे प्राधान्य किंवा आधिक्य दर्शविणार्‍या, नाडीचा वक्र, त्वरित व स्थिर अशा तीन गति आहेत. सर्प, दर्दुर व मयूर हे तीन प्राणी, मनुष्याच्या नाडीच्या त्या तीन गतीचे स्वरूप आपल्या गति-विशेषाने प्रकट करतात व स्पष्टवितात. नाडी विज्ञानात अतींद्रिय ज्ञानाचा अंतर्भाव कसा होतो हे खालील श्लोकांवरून सिद्ध होईल. न च अध्ययन मात्रेण नाडीज्ञानं भविष्यति। एक चित्त: प्रसन्नात्मा मनसा च विशारद:। स्पृशेत् अंगुलिभि नाडीं जानीयात् दक्षिणे भुजे।


नाडीदर्पण

नुसत्या अध्ययनाचा नाडीज्ञानात उपयोग नाही. एकाग्रता, अंत:प्रसाद व मनाची शुचिता असली तरच रूग्णाच्या उजव्या हाताचे नाडीला स्पर्श करावा. मगच, अध्ययनाचे अतीत असणारे नाडीज्ञान होऊ शकते. जलाष, जल, सोम, अमृत - ‘जलाष’ नावाचे एक सर्व-व्याधिहारक अमृत, वैदिक रुद्रदेवतेजवळ असे. अशा औषधाला ग्रीक लोक ‘पॅनासीआ’ (Panacea) म्हणत. हे बहुधा एकादे ‘रसायन’ असण्याचा संभव आहे. रसायन शास्त्राचीही वेदकाळी बरीच प्रगति असावी, असे अनुमान यावरून काढले जाते. ‘अमृत हे जलामध्येच आहे’, ‘रोग नाशाची शक्ती पाण्यामध्ये आहे’ असे काही उल्लेख ऋग्वेदात आढळतात. थालिस (Thales) या ग्रीकपूवर्व तत्त्वज्ञाचे हि जलाबद्दलचे असेच एक विधान आहे. आज पाश्चात्य वैद्यकातहि Hydrotherapy चा, जल-चिकित्सेचा, मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ऋग्वेदातील ‘सोम’ या वनस्पतीची अमृतत्व देणारी, सर्व रोगांचा संहार करणारी अशी वर्णने आहेत. ‘हुअम’ नावाची वनस्पति हिमालय, अफगाणिस्तान, तिबेट येथे आढळते. ती हिमालयात व तिबेटमध्ये मी स्वत: अनेकवेळा व अनेक ठिकाणी पाहिली आहे. ‘कीम’, ‘हुएम्’ अशी त्या वनस्पतींची निरनिराळी नावे तेथील लोकांनी मला सांगितली. उ.ध्रुव प्रदेशात संचार करीत असताना तेथील आदिवासी ‘कुआम्’ नावाची वनस्पती वेदातील ‘सोम’ वनस्पतीप्रमाणेचे सर्व रोग-हारक व मृत्यूपासून वाचविणारी, अमर करणारी अशी मानतात, असे माझ्या आढळात आले. आस्ट्रेलियाच्या उत्तर टोकावर असलेल्या ‘ग्रीन आयलंड’ या ठिकाणी मला असे सांगण्यात आले की, बहुतेक रोगांवर एकच वनस्पति पाण्यात उकळून पितात. या वनस्पतीचे नाव आता माझ्या लक्षात नाही. वायव्य रशिया, पूर्व जर्मनी, कॉलिफोर्निया, हवाई बेटे जपानमधील नागासाकीचा व टोकिओनजीक असलेल्या प्रशांत ज्वालामुखीचा परिसर, या सर्व ठिकाणी, आपल्या सोम वनस्पतींशी सर्वथैव तुलनीय अशी वनस्पति प्रसिद्ध असल्याची प्रमाणे मला मिळाली. दक्षिण फ्रान्समध्ये असलेल्या लूर्डस् (Lourdes) या ठिकाणच्या पाण्याने, अर्धांग, क्षय यांसारखे रोग पूर्ण बरे झाल्याची २५-३० उदाहरणे मला प्रत्यक्ष दाखविण्यात आली. या ठिकाणी, रोज सर्व जगातून हजार ते दीड हजार माणसे येत असतात. सेंट बर्नाडेट हिच्या प्रार्थनेने हा स्वर्गीय निर्झर प्रकट झाला आहे. तेथील भिक्षुवर्ग काही लॅटिन मंत्रांचे विनियोग करीत असतात. मी लूर्डस् येथील रोगपरिहारक नैसर्गिक, मांत्रिक व दैवी पद्धतींचा मोठ्या जिज्ञासेने अभ्यास केला. ऋग्वेदात, रोगपरिहारक म्हणून जल व सोम या दोन वस्तूंवर विशेष भर दिलेला आहे. जगातल्या बहुतेक देशात आजदेखील सोम-सदृश एखादी वनस्पती व जल यांचा रोगपरिहारासाठी उपयोग केला जात आहे, हे माझ्या पृथ्वीप्रदक्षिणेत प्रत्यक्ष अवलोकनात आले. माझी स्वत:ची श्रद्धा अशी आहे की, ऋग्वेदकाली व विशेषत: आथर्वणकाली मंत्र-शक्ति, अतींद्रिय शक्ती व अतिमानस शक्ती यांचा विनियोग रोगपरिहाराचे क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात करण्यात येत असावा. त्या प्रक्रियांचे संशोधन आज झाले पाहिजे.


माधव-निदान, माधवकार व भाष्यकार

निदाने माधव: श्रेष्ठ: सूत्रस्थाने तु वाग्भट:।।

शारीरे सुश्रुत: प्रोक्त: चरकस्तु चिकित्सते।।

माधवनिदान या ग्रंथाचे मूळ नाव ‘रोगविनिश्चय’ असे आहे. ‘रोग व निश्चया’ची पारिभाषिक संज्ञा ‘निदान’ अशी आहे.

माधवप्रणीत रोग विनिश्चय ग्रंथ या अर्थाने ‘माधव-निदान’ असा शब्द प्ररुढ झाला आहे. हा ग्रंथ संकलनात्मक आहे. इतर ग्रंथांतील श्लोकांचा माधवाचार्यांनी या ग्रंथांत फक्त संग्रह केला आहे. हा ग्रंथ करताना काही वेळा संदर्भ नसलेला श्लोक-पाद तसाच लिहून गेलेला आहे. उदाहरणार्थ, ग्रहणीयोगनिदान या प्रकरणातील त्रिदोष-ग्रहणी लक्षण सांगताना, ‘तेषां वक्षामि भेषजं’ असा श्लोक-पाद निष्कारण उद्धृत झाला आहे.

पृथग्वातादि निदिष्टहेतुलिंगसमागमे।

त्रिदोषं निर्दिशेत् एवं, `तेषां वक्षामि भेषजं'।।

या श्लोकातील ‘तेषां वक्षामि भेषजं’ हा पाद येथे सर्वथैव अनुचित आहे. कदाचित हा प्रक्षिप्त देखील असेल. आर्यवैद्यकाच्या अध्यापन प्रक्रियेत माधवनिदान या ग्रंथाने एक महत्त्वपूर्ण क्रांति केली आहे. या ग्रंथापूर्वी ग्रंथप्रधान शिक्षण पद्धती प्रचलित असली पाहिजे. चरक, सुश्रुत व वाग्भट यांचे ग्रंथ शिकविले जात असताना ग्रंथकार व ग्रंथ शिकविणे असे अध्यापनाचे स्वरूप असे. माधवनिदान ग्रंथाची रचना व मांडणी अशी आहे की, ग्रंथकारापेक्षा किंवा ग्रंथापेक्षा पाठ्यविषयावर शिष्य-शिक्षकांचे लक्ष अधिक केंद्रित व्हावे. ग्रंथकार व ग्रंथ यांना संपूर्ण महत्त्व न देता ग्रंथांतरीच्या विषयाला अग्रस्थान देणे व विषयाचे अनुरोधाने अनेक ग्रंथकार एकत्र आणणे या पद्धतीचा, माधवकार हा आर्यवैद्यकाच्या इतिहासातील, आद्य पुरस्कर्ता होय. माधवनिदान हा ग्रंथ संकलनात्मक असल्याने विषयनिष्ठ विवेचन हे क्रमप्राप्तच आले. त्यात माधवकाराचे अभूतपूर्व वैशिष्ट्य नाही, असे कदाचित कोणी म्हणेल, पण माधवनिदानात नुसते कोशदृष्टीचे संकलन नाही. त्याने केलेली रचना वर्णानुक्रमपद्धतिसारखी बहिर्मुख नाही. त्याने केलेले संकलन सूक्ष्मदृष्टीने व विषयाचे रहस्य विशद करणारे असे आहे. शिवाय त्याने केलेले वर्गीकरण उपयुक्ततेचे दृष्टीने फारच मोलाचे आहे. (प्राध्यापक, आयुर्विद्या विशारद, गणेश विश्वनाथ पुरोहित यांचा ‘आयुर्वेदीयम् शारीरम्’ (इ.स.१९५५) हा ग्रंथ (भाग १), आयुर्वेदान्वेषण समिती (मुंबई) यांनी प्रसिद्धीली आहे. विषय-निष्ठ संकलनाचा हा एक उत्कृष्ट आधुनिक आदर्श आहे. कदाचित माधवनिदानापासून त्यांना स्फूर्ति मिळाली असेल. मला स्वत:ला तर असे वाटते की, माधवनिदानाच्या संकलनात्मक रचनेत प्रकट झालेली प्रतिभा, पूर्णत: स्वत:सिद्ध व स्वयंप्रकाश असली पाहिजे. केवळ आनुपूर्वीसाठी, आयुर्वेदीय विचारणेची संततिधारा अखंडित दिसावी म्हणून, पूर्वपरंपरेबद्दल आदर जागृत असावा म्हणून माधवकारांनी ही गुंफण पूर्वाचार्यांच्या शब्दांत सहेतुकपणे केलेली आहे. आयुर्वेदाच्या अध्यापनात व अध्ययनात त्यांनी एका अभिनव दृष्टीकोनाचा निवेश केला आहे. हा दृष्टीकोन एच्.जी.वेल्स्, ड्यूई, या आधुनिक पाश्चात्य तत्त्वविवेचकांनी विशेषत्वाने पुरस्कारिलेला आहे. सॉक्रेटिस-प्लेटोपासून रूसो, पेस्टॉलझी, फ्रोबेल, हर्बार्ट आणि अगदी आजच्या मराया माँटेसरीपर्यंतच्या बहुतेक शिक्षणतज्ज्ञांनी ग्रंथनिष्ठेपेक्षा विषयनिष्ठा सत्य संशोधनाचे दृष्टीने अधिक महत्त्वाची असल्याबद्दल स्वत:चा अभिप्राय नि:संदेहपणे प्रकट केला आहे. विशेषत: शास्त्रीय क्षेत्रात व्यक्तिनिष्ठेपेक्षा, विषयनिष्ठा, वस्तुनिष्ठा व सत्यनिष्ठा केव्हाही अधिक श्रेयस्कर होय. माधवकरापूर्वी आर्यवैद्यकाच्या इतिहासात असे, विषयनिष्ठ संकलन पूर्वीही कोणी केलेले असेल. चिकित्सकतेवर, शारीरावर या विषयनिष्ठ पद्धतीचे आज तरी ग्रंथ उपलब्ध नाहीत. पूर्वी अशा तऱ्हेचे काही ग्रंथ असले पाहिजेत. ‘शारीरा’वर भोज यांचे, शालाक्य तंत्रावर नीमि, विदेह, यांचे तंत्र-ग्रंथ असल्याची प्रमाणे डल्हणाचे टीकेत व दुसर्‍या टीकाग्रंथात आढळतात. माधवकार हे नुसते वृत्ती-वैद्य नसून प्रामुख्याने अध्यापक म्हणून त्यांचे जीवनकार्य अधिक महत्त्वाचे झाले असले पाहिजे. त्यांनी हा ग्रंथ प्रथम स्वत:च्या विद्यार्थ्यांसाठीचा लिहिला असावा. ते एक अभिजात अध्यापक व आचार्य होते. माधवनिदानाचे कर्ते माधवाचार्य हे विजयनगरच्या राजाचे प्रधान सायणाचार्य यांचे वडील-बंधू जे पंचदशीकार माधवाचार्य अथवा विद्यारण्यस्वामी तेच होत अशीही एक उपपत्ति आहे, पण या उपपत्तीला ऐतिहासिक आधार मिळत नाही. प्रत्यक्ष माधवनिदानात फक्त एवढाच उल्लेख आढळतो की ग्रंथाचा कर्ता माधवकर हा इंदुकराचा मुलगा होय. त्याने हा ग्रंथ अनेक श्रेष्ठ वैद्यांच्या आज्ञेवरून लिहिला. अनेक ऋषींच्या वचनांचा यात संग्रह आहे. यात उपद्रव (अन्यविकार), मरणसूचक लक्षणे, रोग होण्याची कारणे व रोगाचे प्रत्यक्ष स्वरूप सांगितले आहे.

नाना मुनीनां वचनैरिदानी,

समासत: सद्भिजषां नियोगात्।

सोपद्रवारिष्टनिदान लिंगे

निबध्यते रोग-विनिश्चयोऽयम्।।

“रोगाचे ज्ञान सुलभतेने व्हावे व ते अल्पबुद्धीच्या आणि निरनिराळी वैद्यक-तंत्रे माहीत नसलेल्या, वैद्यांना व्हावे म्हणून हा ग्रंथ रचला आहे.”

नानातंत्र विहीनानां भिषजां अल्पमेधसाम्।

सुखं विज्ञातु मातङ्क अयमेव भविष्यति।।

माधवनिदान ग्रंथांत रोग विज्ञानाचे पाच प्रकार सांगितले आहेत. हे सर्व रोग विनिश्चयाला उपकारक आहेत. त्यांना निदानपंचक असे म्हणतात.

निदानं पूर्वरूपाणि रूपाण्यपचयस्तथा।

संप्राप्तिश्चेति विज्ञानं रोगाणां पंचधास्तृतम्।।

माधवनिदान या ग्रंथातील पंचनिदान हे पहिले प्रकरण अत्यंत सुश्लिष्ट, अल्पशब्द व बव्हर्थवाचक आहे.

माधवनिदान या ग्रंथावर मधुकोश व आतंकदर्पण अशा दोन टीका प्रसिद्ध आहेत. ऑफ्रेटच्या कॅटलॉगमध्ये आठ टीकांचा उल्लेख आहे.

आतंकदर्पण ही टीका विशेषत्वाने माधवनिदानातील प्रत्येक पदाचा व पंक्तीचा गोपीमोहन, कविराज यांच्या ‘मुक्तावलि’ नामक ग्रंथांत खालील श्लोक आढळतो. त्यात उल्लेखिलेला ‘रत्नमाला’ हा ग्रंथ माधवकारांनी लिहिला असला पाहिजे.

कदाचित्, माधवनिदानाला उद्देशूनदेखील तो श्लोक असण्याचा संभव थोडासा आहे. ‘रत्नमाला’ स्वतंत्र ग्रंथ असण्याचाही तितकाच संभव आहे. यादव शर्मा, हे रत्नमाला हा स्वतंत्र ग्रंथ असावा, असे मानतात.

मुक्तावलीतील श्लोक असा आहे -

पूर्वं लोकहिताय माधवकराऽभिख्यो भिषक् केवलं।

कोषान्वेषणतत्पर: प्रविततायुर्वेद रत्नाकरात्।।

मालां रत्नमयींचकार स यथालाभं न शोभाधिका।

साऽस्माभि: कमनीयभक्तिरचनद्वाराऽन्यथा ग्रथ्यते।

माधवकर व त्याचे टीकाकर यांचेबद्दल साधारणपणे एवढी माहिती आज उपलब्ध आहे.


आयुर्वेद (ऐतिहासिक दृष्टीक्षेप)

वैदिक उगम

जगातल्या सर्व विद्याविज्ञेषांचा उगम वैदिक वाङ्मयात आहे. आयुर्वेदाचा उगमहि प्रत्यक्ष ऋग्वेदात आहे. (म.१ सूक्त ३४) या सूक्तात औषधांचे त्रिविध प्रकार असल्याबद्दल स्पष्ट उल्लेख आढळतो. दिव् (हवा व उष्णता), पार्थिव (खनिज, उद्भिज पदार्थ), औदक (प्रवाही किंवा द्रवरूप) हे ते तीन वर्ग होत. त्रिदोष उपपत्तीचे उगमस्थान हे ‘त्रि-धातू’ उल्लेखणारे सूक्त (म.१, ३४) आहे असे सायणाचार्य मानतात. अश्वीदेव हे देवांचे वैद्य असून औषधिप्रयोग, शल्यचिकित्सा इत्यादी वैद्यक विभागात ते अत्यंत निष्णात होते. आयुर्वेद ब्रह्म्यापासून प्रजापतीला, त्याच्यापासून अश्वीदेवांना व त्यांच्याकडून इंद्राला मिळाला. ही परंपरा सर्वसामान्य आहे. पण, पुढे शाखा भेद दिसतात. अश्वीदेवांच्यामुळे च्यवन ऋषींना पुनश्च तारुण्यप्राप्ती झाली. विश्पला या धाडसी वीरस्त्रीची युद्धात तुटलेली मांडी, अश्वीदेवांनी ‘आयसीजंघा’ म्हणजे लोखंडाची मांडी करून पुनश्च सांधली. घोषा या स्त्रीचा कुष्ठरोग त्यांनी बरा केला. अथर्ववेदाच्या दशम मंडळांत सृष्टीच्या उपपत्तीबद्दल एक सूक्त आहे. त्यामध्ये मानवी शरीराच्या अंग-प्रत्यंगाचे सूक्ष्म वर्गीकरण व विवेचन केले आहे. ब्रह्मा, प्रजापति व इंद्र ही वैदिक वैद्यकाची त्रयी होय. इंद्राने आत्रेयाला आयुर्वेद शिकवला. आत्रेय संहितेमध्ये ४६,५०० श्लोक आहेत. आत्रेयाने अग्निवेश, भेल इत्यादींना शिकविला. नंतर चरकाने अग्निवेश संहिता प्रसिद्ध केली. इंद्र, आग्नेय, अग्निवेश व चरक ही आयुर्वेदीय औषधि-तंत्राची परंपरा आहे. इंद्रानेच धन्वन्तरीला शस्त्रविद्या दिली. भारतीय शस्त्र-वैद्यकाचे पितृपद धन्वन्तरी या महापुरुषास आहे. धन्वन्तरी यानेच ‘अमृत’ नावाचा सिद्धरस, रसायन किंवा कल्प तयार केला असावा. शिवाय, शल्यतंत्राचाही हा प्रमुख प्रणेता आहे. सुश्रुताने शल्यतंत्र (सर्जरी) विस्तृतपणे विशद केले आहे. इंद्र, धन्वंतरी, द्विवोदास व सुश्रुत ही आयुर्वेदीय शल्यतंत्राची, सर्जरीची, परंपरा आहे. ग्रीक वैद्यकाचे पितृपद Aesculapius यांचेकडे आहे. केवळ पितृपद एवढेच साम्य त्या दोघांत आहे. धन्वन्तरीची प्रतिभा, भारतीय वैद्यकावर या क्षणापर्यंत त्याने व त्याच्या शिष्य-संततीने केलेले चिरस्थायी परिणाम, ध्यानात घेता Aesculapius हा ग्रीक वैद्यकवेद्या अगदीच किंचितज्ञ व किंचित्कार वाटतो. पूर्वापरतेचा विचार केला तर Aesculapius हा धन्वन्तरीच्यानंतर कित्येक शतकांनी झाला असला पाहिजे. धन्वन्तरीचे वास्तव्य काशीमध्ये होते. ‘विद्वांसो हि देवा:’ या शतपथीय सिद्धांताप्रमाणे या विद्वद्वरेण्याला देवपदप्राप्त झाले होते. याची उपपत्ती, समुद्रमंथनातून निघालेल्या चवदा रत्नांतील एक रत्न म्हणून झाल्याचे, काव्यमय वर्णन एका कवि-पंडिताने केले आहे. ‘लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वंतरीश्चंद्रमा:’ या मंगलाष्टकांतील सुप्रसिद्ध पंक्तीने धन्वन्तरीच्या स्वर्गीय म्हणजे दिव्य कार्य विशेषाचाच गौरव करण्यात आला आहे. धन्वन्तरी हे आदर्श प्रतीक किंवा देवता असून त्या देवतेचा प्रत्यक्ष मानवी अवतार म्हणजे काशीचा राजा दिवोदास असेही मानले जाते. पण मला वाटते धन्वन्तरी हा एक आयुर्वेत्ता, औषधि व शल्य ही दोन्ही तंत्रे जाणणारा, महर्षि होता. आत्रेय पुनर्वसूहि, असाच सव्यसाची आयुर्वेत्ता होता. आत्रेयांचा अग्निवेश आणि धन्वन्तरीचा दिवोदास या दोन शिष्यांनी आयुर्वेदाच्या, औषधितंत्र व शल्यतंत्र, या शाखा स्वतंत्रपणे परिपुष्ट केल्या आहेत. आत्रेय व धन्वंतरी हे द्विशाख आयुर्वेदाचे आद्य संस्थापक होत. धन्वंतरीचा काल इ.स.पूर्व १००० ते १५०० असावा.


चरक संहिता

सामान्यत: अथर्ववेद हे आयुर्वेदाचे उगमस्थान समजले जाते. अथर्वकाली, मूत्रमार्गावर व गर्भाशयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जात असावी याबद्दलचे निर्णायक उल्लेख आहेत. यज्ञसंस्थेत पशुहनन शास्त्र-संमत असल्यामुळे मानवी शरीराच्या अंगप्रत्यंगाचे ज्ञान त्यांनी पशूंच्या शरीराची प्रत्यक्ष चीरफाड करून मिळविले होते. ऋग्वेदानंतर काही शतकांनी अथर्ववेद झाला असे सामान्यत: समजले जाते, पण अथर्ववेदातील काही भाग ऋग्वेदापेक्षाहि अधिक प्राचीन असावा अशी एक नवीन सप्रमाण उपपत्ति उपलब्ध झाली आहे. पण या स्थली इतका सूक्ष्म विचार करण्याचे आपणास कारण नाही. सर्वसाधारणपणे वेदकाल इ.स.पूर्वी ६,००० वर्षांच्या अलीकडे येऊ शकत नाही, एवढे निश्चित. अथर्ववेदानंतर व पाणिनीचे पूर्वी (इ.स. पूर्वी ८ वे शतक) म्हणजे अदमासे पाच हजार वर्षांत उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मणे, महाभारत, रामायण, धर्मसूत्रे, दर्शन व आर्य वैद्यकाचे आद्य आधारग्रंथ किंवा मूल संहिता व नंतर शेवटी चरक व सुश्रुत या क्रमाने ही सर्व निर्मिती झाली असली पाहिजे. चरकाचा काल पाणिनीच्या (इ.स.पूर्वी ८ वे शतक) अलीकडे येऊच शकत नाही. म्हणजे इ.स. पूर्वी एक ते दीड हजार या ५०० वर्षांचे कालात प्रथम चरक व नंतर सुश्रुत झाले असावेत. इ.स.पूर्वी आठवे शतक हा पाणिनीचा काल निश्चित आहे. गोल्डस्टकर, डॉ.भांडारकर, प्रफुल्लचंद्र रे यांचे पाणिनीच्या या काळाबद्दल ऐकमत्य आहे. आयुर्वेदातल्या अनेक पारिभाषिक संज्ञांचा पाणिनीच्या सूत्रांमध्ये निर्देश झालेला आहे. पाणिनीनंतर चारशे वर्षांनी झालेल्या काव्यायन नावाच्या वार्तिककाराने त्रिदोषांचा - वात, पित्त, श्लेष्मा - एकत्र उल्लेख केलेला आहे. अथर्ववेदानंतर व पाणिनीपूर्वी आर्य वैद्यकांमध्ये फारच प्रगति झाली असली पाहिजे. व्याकरणशास्त्रात आयुर्वेदीय परिभाषा निविष्ट झाली. याचाच अर्थ तत्पूर्वी फारच मोठ्या प्रमाणात आर्यवैद्यक परिणत व समृद्ध झाले असले पाहिजे. चरक व सुश्रुत हे दोन आर्यवैद्यकाचे अधिष्ठान भूत ग्रंथ समजले जातात. चरकाचार्यांच्या ग्रंथाचा पूर्वेतिहास असा आहे. अति-पुत्र आत्रेय पुनर्वसु, या महर्षिने आपल्या सहा शिष्यांना वैद्यकशास्त्र शिकविले. त्यांची नावे, अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारीत आणि क्षारपाणी अशी होती. या सर्वांनी, आत्रेय पुनर्वसूंनी शिकवलेल्या शास्त्राच्या, टिप्पण्या (Notes) केल्या होत्या. त्या सर्व टिप्पण्यांमध्ये, अग्निवेशाने केलेले टाचण सर्वोत्कृष्ट ठरले. पुढे, चरकाने या अग्निवेश तंत्राचे संकलन व संशोधन करून ते प्रसिद्धीस आणले. आयुर्वेदाची आद्यसंहिता म्हणून या चरक-ग्रंथाचे स्थान अद्वितीय आहे. चरक ग्रंथाची मांडणी संपूर्णपणे वैदिक पद्धतीची आहे. या ग्रंथामध्ये गद्य-पद्यात्मक अशी उभय-विध रचना आहे. अध्ययांची नावे ठेवण्याची पद्धती वैदिकच आहे. वेदांत जसे नासदीयसूक्त, मन्युसूक्त, अस्यवामीयसूक्त ही नावे सूक्तातल्या पहिल्या अक्षरावरून दिलेली आहेत. त्याप्रमाणे चरककांतदेखील पहिल्या शब्दावरून अध्ययाचे नाव लिहिण्यात आले आहे. उदा. अपामार्ग, आरग्वधीय, मालाशीतीय ही पहिल्या तीन अध्ययांची नावे, अध्ययांच्या पहिल्या शब्दांवरून देण्यात आली आहेत. त्तैत्तिरीय उपनिषदांतील शिक्षावल्लीची आठवण करून देणारी अनेक स्थळे अग्निवेशतंत्रांत अगर चरकात आढळतात. वैदिक संस्कारांचा निर्देश चरकांत पुष्कळ ठिकाणी आहे. विमानस्थानातील आठव्या अध्यायात शिष्योपनयाचा वैदिक संस्कार निवेदिला आहे. गर्भिणी व सूतिका यांचे संबंधीही संस्कार सांगितले आहेत. चरक व सुश्रुत या दोन ग्रंथांशिवाय संस्कारांचे उल्लेख दुसर्‍या कोणत्याही वैद्यक ग्रंथांत नाहीत. सुश्रुतांत संस्काराबद्दलचे निर्देश चरकापेक्षा अधिक आहेत. तज्ज्ञांचे संभाषण जसेच्या तसे ग्रंथांत निविष्ट करणे या प्रकाराला `तद्विद्य संभाषा' असे म्हणतात. चरकाच्या सूत्र-स्थानातील १२, २५, २६ व विमान-स्थानातील तिसऱ्या अध्यायात तद्विद्यसंभाषा म्हणजे विद्वानांचे प्रत्यक्ष संवाद उद्धृत केले आहेत. ही संभाषणे अत्यंत उद्बोधक मार्मिक व अतीव रसमधुर आहेत. वैदिक व उपनिषद कालानंतर अग्निवेषतंत्र निर्माण झाले असावे. याबद्दलचे `तद्विद्यसंभाषा' हे एक निर्णायक प्रमाण होय. दर्शनकालाच्या पहिल्या खंडामध्ये चरक-तंत्राचा उदय झाला असला पाहिजे. चरकामध्ये वैशेषिक दर्शनांतील सहा पदार्थांचा अंतर्भाव आढळतो. पण, ‘अभाव’ पदार्थांचा उल्लेख नाही. अपमान या प्रमाणाचाही नाही. म्हणून वैशेषिक दर्शनाचा काल आहे. दर्शन ग्रंथांचा पहिला कालखंड हाच समजला जातो. ख्रिस्तपूर्व एक हजार हा काल सुश्रुताचा समजला जातो. त्याच्या पूर्वी एक हजार वर्षांत प्रथम आत्रेय-संहिता, नंतर अग्निवेष-तंत्र, नंतर चरककृत प्रतिसंस्करण या तीन अवस्था क्रमाने होत आल्या असाव्यात. चरकात आयुर्विद्येच्या वैदिकतेची वैशिष्ट्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झाली आहेत. चरक संहितेचे आठ भाग व १२० अध्याय आहेत. चरक व सुश्रुत यांच्या ग्रंथांना आर्षसंहिता असे म्हणतात. आर्य वैद्यकांचे आर्ष व ऐतिहासिक असे दोन विभाग साहजिकपणे पडतात. आर्ष विभागाचा विस्तार फारच प्रचंड होता. चरकाने विमानस्थानातील आठव्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की वैद्य होऊ इच्छिणारांनी आठव्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की ‘वैद्य होऊ इच्छिणारांनी प्रथमपासून श्रेष्ठतम शास्त्र ग्रंथाची निवड करावी. कारण वैद्यकशास्त्रावर विविध स्वरूपाचे अनेक शास्त्रग्रंथ उपलब्ध आहेत.

’ भिषग्बुभूषु: शास्त्र मेवादित: परीक्षेत।

विविधानिहि शास्त्राणि भिषजां प्रचरन्ति लोके।

चरकाने श्रेष्ठ ग्रंथाची काही लक्षणेही सांगितली आहेत. त्यातले एक लक्षण असे ‘सुप्रणीत सूत्र भाष्य संग्रह क्रमम्’ चरकाने शास्त्र शब्दाला प्रतिशब्द म्हणून ‘सूत्र’ शब्द सांगितला आहे. आद्य शास्त्रकारांना चरकाने ‘सूत्रकार’ अशी संज्ञा दिली आहे. सूत्र शब्दाची खालील व्याख्या प्रसिद्धच आहे.

स्वल्पाक्षर मसंदिग्धं सारवद्विश्चतोमुखं

अस्तोभमनवद्यं च सूत्र सूत्रविदो विदु:।।

एवंच मूलसूत्रे व त्यावरील भाष्ये असलेले अनेक वैद्यकीय ग्रंथ चरकाचे काली व पूर्वी उपलब्ध होते हे स्पष्ट आहे. आर्षकाली, निदान लक्षणे व चिकित्सा हे तीन स्कंध असलेला आयुर्वेद इंद्राने प्रथम भारद्वाजाला शिकविला. त्याच्यानंतर अत्रि-पुत्र पुनर्वसू हा आयुर्वेद शिकला व त्याने अग्निवेषादि स्वत:च्या सहा शिष्यांना तो शिकविला. चरकाचे वेळी ‘षड्भिषक-संहिता’ या नावाने आत्रेय पुनर्वसूंच्या सहा शिष्यांनी लिहिलेल्या सहा संहिता चांगल्याच प्रसिद्ध होत्या. चरकाने चिकित्सास्थानाच्या अठराव्या स्थानात आत्रेय पुनर्वसु याला भिषग्विद्येचा प्रवर्तक असे म्हटले आहे.

आयुर्वेदविदाम् श्रेष्ठ भिषग्विवद्या-प्रवर्तकम्।।

आत्रेयसंहिता किंवा अग्निवेश यांच्या तंत्राचाच नवा अवतार होय. औषधितंत्र व शल्यतंत्र अशा उपचाराच्या दोन पद्धति अथर्ववेदांपासून प्रचलित आहेत. इंद्र, भारद्वाज, आत्रेय, अग्निवेश व चरक ही औषधि तंत्राची परंपरा होय. त्याचप्रमाणे शल्य तंत्राची परंपरा आहे. इंद्र, धन्वंतरी, काशीचा राजा दिवोदास व सुश्रुत ही शल्यतंत्राची (सर्जरी) परंपरा होय. आद्य औषधितंत्र आत्रेय याने सांगितले, अग्निवेशाने लिहिले. त्याचप्रमाणे शल्यतंत्र काशीराज दिवोदासाने सांगितले व सुश्रुताने लिहिले. सुश्रुतकाली दुसऱ्याही शल्यसंहिता उपलब्ध होत्या. पूर्वाचार्यांच्या व पूर्व सूरींच्या उपलब्ध ग्रंथावर ‘संस्कार’ करून अभिनव तंत्र निर्माण करण्याची पद्धती व प्रक्रिया आर्षकाली उपलब्ध होती. स्वत: चरकानेच ‘संस्कर्ता’ शब्दाचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.

विस्तारयति लेशोक्तं संक्षिपत्यति विस्तरं।

संस्कर्ता करुते तंत्रं पुराणंच पुनर्नवम्।।

आर्षकाली पूर्व-संहितांचा संस्कर्ता म्हणजे अभिनव ग्रंथकार असाच अर्थ अभिप्रेत असे. अथर्ववेदातले औषधि-प्रयोग व शल्यप्रयोग, त्याचप्रमाणे इंद्रपासून भारद्वाज, आत्रेय, अग्निवेश व चरकापर्यंत, तसेच इंद्रापासून धन्वंतरी, दिवोदास ते सुश्रुतापर्यंतचे शल्यतंत्र हे सर्व वाङ्मय आर्ष वैद्यकात अंतर्भूत होते. चरक-सुश्रुत या दोन ग्रंथांत देखील अनेक संस्करणे झाली आहेत. चरक तंत्रावर कपिल बलाचा पुत्र दृढबल याने अनेक संशोधने व संस्कार केले होते. याचा पुरावा चरकाच्या चिकित्सास्थानात अध्याय तीस यामध्ये सापडतो. कल्प व सिद्धीस्थान त्याचप्रमाणे चिकित्सास्थानातील सतरा अध्याय हे दृढबलाने निक्षिप्त केले आहेत.

अस्मिन् सप्तदशाध्याया: कल्पा: सिद्धय एव च।

नासाद्यन्तेऽग्निवेशस्य तन्त्रे चरक संस्कृते।।

तानेतान् कपिलबलि: शेषान् दृढबलोऽकरोत्।

तन्त्रस्यास्य महार्थस्य पूरणार्थं यथातथम्।।

सुश्रुताचा एक प्रसिद्ध टीकाकार डल्लन हा सांगतो की, सध्या उपलब्ध असलेला सुश्रुत ग्रंथ बौद्ध भिक्षु नागार्जुन याने अनेक संशोधने घालून रूपांतरित केला आहे. (इ.स. १००) चरक व सुश्रुत हे दोन ग्रंथ म्हणजे आयुर्वेद-विद्येचे ज्ञानकोश आहेत. आद्य प्रणेते म्हणून चरक किंवा सुश्रुत यांचा अग्रमान असला तरी अनेक संस्कर्त्यांचे शोध त्यात अंतर्भूत आहेत.


दिवोदास, पैल-निदान व पंधरा तंत्रे

आयुर्वेद हा अथर्ववेदांतर्गत आहे. अथर्ववेदाचे सारसर्वस्व म्हणजे आयुर्वेद. प्रत्यक्ष विधात्याने म्हणजे प्रजापतीने एक लक्ष श्लोकांची संहिता रचून जणू काय अथर्ववर्चस्व असलेला आयुर्वेद निर्माण केला.

विधाताऽथर्वसर्वस्वं आयुर्वेदं प्रकाशयन्।

स्वनाम्ना संहितां चक्रे लक्षश्लोकसमयी ऋजुम्।।

प्रजापतीने चर्तुवेदाचे सार म्हणून हा पश्चमवेद निर्माण केला व तो भास्करला दिला. भास्कराने स्वत: आयुर्वेद संहिता केली व ती आपल्या शिष्यांना दिली. नंतर त्या शिष्यांनी स्वत:च्या संहिता केल्या.

ऋग्यजु: सामाथर्वाख्यान्दृष्व्टा वदान प्रजापति:।

विचिन्त्य तेषामर्थश्चायुर्वदं चकार स:।।

कृत्वा तु पंचमं वेदं भास्कराय ददौ विभु: ।।

स्वतंत्रसंहितां तस्मात् भास्करश्च चकार स:।

भास्करश्च स्वशिष्येभ्य: आयुर्वेदं स्वसंहिताम् ।

पददौ पठयामास ते चक्रु: संहितास्तत:।

ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मखंड, अध्याय १६

प्रजापतीचे १५ शिष्य झाले व त्यांनी १५ तंत्रे लिहिली आहेत. त्यांची नावे व ग्रंथ याप्रमाणे आहेत - धन्वंतरी (धन्वंतरी), दिवोदास (चिकित्सादर्पण), काशीराज (चिकित्सा कौमुदी), आश्विनेय (चिकित्सासार यंत्र), नकुल (वैद्यसर्वस्व), सहदेव (व्याधिसिंधुविमर्दन), यम (ज्ञानार्णव), च्यवन (जीवदान), जनक (वैद्यसंदेह भञ्जनम्), बुध (सर्वसार), जाबाल (तंत्रसारकम्), जाजलि (वेदांगसारतत्त्व), पैल (निदान), करथ (सर्वधरम्), अगस्त्य (वैद्य निर्णयतंत्र). वरील यादीतील एक शिष्य पैल यांनी ‘निदान’ नावाची संहिता केली होती. माधवकारांचा प्रस्तुत ‘निदान’ ग्रंथ हा पैल मुनीच्या निदानसंहितेचा पुनरवतार असेल काय? या सर्व संहितांचा काल इ.स.पूर्वी तीन ते दोन हजार वर्षे हा असावा. या संहितकालातच चरक (इ.स.पूर्वी १५००) व सुश्रुत (इ.स.पूर्व १०००) यांचा काल येतो. याच कालात आगेमागे अग्निवेष, भेल, जतुकर्ण, पराशर, हारीत, गौतम या महर्षींचे आयुर्वेदीय संशोधन झाले असले पाहिजे. चरक-सुश्रुतानंतर वाग्भट, दृढबल, नागार्जुन यांचा काल येतो. शकांच्या व बुद्ध धर्माच्या आक्रमणामुळे, ख्रिस्तपूर्व २०० ते इ.स. ३०० पर्यंत, आयुर्वेदाची प्रगति थांबली. औषधि व शल्य यांचे ऐवजी रसायन आले. पण सातव्या शतकात शतकातल्या माधवकराने आयुर्वेदजान्हवीचा विचारप्रवाह पुनश्च ओजस्वी स्वरूपात प्रकट केला.


सुश्रुत - संहिता

चरकानंतर झालेल्या सुश्रुत संहितेमध्ये आयुर्वेदाचे उपपत्तिबद्दल चरकात आलेल्या कथेहून थोडी निराळी कथा सांगण्यात आली आहे. काशीचा राजा दिवोदास हा धन्वंतरीचा साक्षात् अवतार होता. तो वान-प्रस्थाश्रमी झाल्यावर औषधेनव, वैतरण, औरभ्र, पौष, कलायान, करवीर्य, गोपूर-रक्षित हे सात व दुसरे अनेक महर्षि दिवोदासचे आश्रमात गेले व त्यांच्यापासून ‘आयुर्वेदविद्या’ त्या सप्तमहर्षिंनी आत्मसात केली. अथर्ववेदाचे उपांग असलेल्या व दिवोदासांनी प्रकट केलेल्या आयुर्वेदाचे एक हजार अध्याय व एक लक्ष श्लोक आहेत. तत्कालीन जनतेची बुद्धी अल्प व आयुष्य थोडे यासाठी या प्रचंड आयुर्वेदाचे दिवोदासांनी आठ विभाग केले. ते आठ विभाग म्हणजे शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, कायचिकित्सा, भूत-विद्या, कौमार-भृत्य, अगदतंत्र,


रसायनतंत्र व वाजीकरण विद्यातंत्र

भगवान् धन्वंतरी यांना, संपूर्ण आयुर्वेद अवगत होता. केवळ एका शल्यतंत्राचे ते आचार्य नव्हते. उपस्थित शिष्यांना ते म्हणाले, “या आठ अंगांपैकी ज्याला जे अंग शिकण्याची इच्छा असेल त्याला ते अंग मी शिकविन” शिष्य उद्गारले, “आम्हा सर्वांना शल्यमंत्र शिकवा. आम्हा सर्वांमध्ये ऐकमत्य आहे. सुश्रुत हा आमचा प्रमुख प्रतिनिधी आहे. तो जे प्रश्न विचारील त्या सर्वांची उत्तरे आपण द्यावी. आम्ही सर्व ती ऐकू व सुश्रुताबरोबर आम्हालाही हे शल्यतंत्र अवगत होईल” भगवान धन्वंतरी सुश्रुताला म्हणाले, “व्याधि उपसृष्टनाम् व्याधि-परिमोक्ष: स्वस्थस्य रक्षणंच - आयुर्वेदस्य प्रयोजनम्।। रोगग्रस्थांच्या रोगांचा परिहार आणि जे निरोगी असतील त्यांच्या स्वास्थ्याचे रक्षण हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे” या विद्येला आयुर्वेद म्हणण्याचे कारण भगवान धन्वंतरी म्हणतात, “या विद्येत आयुष्याचे म्हणजे जीवनाचे रहस्य आहे. (आयुरस्मिन् विद्यते।) किंवा हे शशस्त्र जाणल्याने आयुर्वद्धि होते, जीवन समृद्धि होते, अनेन वा आयुर्विदति इति आयुर्वेद: ।।” ‘सुश्रुत संहिता’ प्राचीन आर्यांच्या शल्यतंत्राचा (Surgery) एक आदर्श आहे. सुश्रुत हा समकालीन शल्य-तज्ज्ञ होता व विश्वामित्र ऋषींचा तो मुलगा असे डॉ.मुथूंचे मत आहे. सुषेण हाही एक रामाचा शस्त्र-वैद्य होता. चरकाने रोगाचे वर्गीकरण उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. त्याचे विवेचन मूलगामी व प्रसादयुक्त आहे. पण एकंदर रचना पद्धतीत असावी तेवढी सुश्लिष्टता नाही. चरक-संहितेपेक्षा, सुश्रुत-संहिता अधिक व्यवस्थित व सु-सूत्रित आहे. सुश्रुत संहितेत शरीराच्या सर्व अवयवांचे वर्णन चिकित्सक पद्धतीने केले आहे. आजकालच्या `सर्जरी'मधील सर्व उपकरणे व शस्त्रे ही सुश्रुतकालीन शस्त्रसंभाराची प्रगल्भ व उत्क्रांत रूपे आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला मूर्च्छा येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मद्य देत असत. याबद्दलचा उल्लेख सुश्रुतात सापडतो. या प्राचीन सुश्रुतप्रणीत शस्त्रविद्येवर आधारलेली अशी एक मोठी इतिहास-प्रसिद्ध शस्त्रक्रिया, इस. ९२७ मध्ये ‘धार’ येथील भोज राजाच्या मेंदूवर दोन शस्त्र-तज्ज्ञांनी केली होती. शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर संमोहनी व संजीवनील अशा दोन वनस्पति अनुक्रमे उपयोजिण्यात आल्या होत्या. ही शस्त्रक्रिया पंडित बल्लाळ यांच्या ‘भोज-प्रबंध’ या ग्रंथात उल्लेखिली आहे. शस्त्रक्रियेचे पाच प्रकार सुश्रुत-संहितेत सांगितले आहेत. तसेच एकशे एक प्रकारची सामान्य उपकरणे, वीस प्रकारची अत्यंत सूक्ष्म असत की त्वचेवरील केसांचे देखील अत्यंत सूक्ष्मतम विभाग ती करू शकत असत.


इति एवम्

वैदिक व भारतीय वैद्यकाचा इतिहास गूढतेने आ-वृत्त आहे. चीनमध्ये सापडलेले बॉवर हस्तलिखित (इ.स.४५०) व त्यांचे डॉ. होर्नली याने केलेले संशोधनपूर्ण प्रकाशन, या घटनेचा भारतीय वैद्यकाची प्राचीनता ठरविण्यास अमोल-अद्भुत उपयोग झाला. आयुर्वेदाचा वैदिक उगमकाल ख्रिस्तपूर्व ५००० वर्षे तरी धरावा लागेल. चरकाचा काल इ.स.पूर्वी १५०० वर्षांच्या आसपास, नंतर धन्वंतरी नंतर सुश्रुताचा काल इ.स.पूर्वी १००० वर्षे, वाग्भटाचा काल इ.स.पूर्वी ४०० वर्षे, नागार्जुन (इ.स.१००), माधवनिदान (इ.स.७००) चक्रपाणिदत्ताची भानुमति (इ.स.१०६०), दल्लनचा निबंधसंग्रह (बारावे शतक), शारंगधरसंहिता (तेरावे शतक), भावमिश्राचा भावप्रकाश (इ.स.१५५८-५९), तोडरमलचे आयुर्वेदसौख्य (इ.स.१५८९) व वैद्यरहस्यकार विद्यापति (इ.स.१६८२) या सर्व आयुर्वेदाच्या उज्ज्वल परंपरेतील, विशेष महत्त्वाच्या व्यक्ती व कृति आहेत.

१०
आयुर्वेदाचे - अंत:स्वरूप

आयुर्हिताहितं व्याधिर्निदानं शमनं तथा।

विद्यते यत्र विद्वद्भि: स आयुर्वेद उच्यते।

अनेन पुरुषो यस्मात् आयुर्विदति वेत्ति च।

तस्मात् मुनिवरैरेष आयुर्वेद इति स्मृत :।।

- भावप्रकाश

आयुष्य म्हणजे जीवन; त्यातले हिताहित म्हणजे कल्याण व अकल्याण किंवा श्रेय व अश्रेय, रोग, निदान व शमन, या पाच विषयांचे विवेचन ज्या शास्त्रात केले आहे. त्या शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतात. जीवनाची किंवा आयुष्याची अधिक उपलब्धि अथवा अधिक प्राप्ति, ज्या शास्त्राने होते व ज्या शास्त्रामुळे जीवनाच्या स्वरूपाचे, मूलतत्त्वाचे व विकासक्रमाचे ज्ञान होते त्याला ‘आयुर्वेद’ असे मुनि म्हणजे आंतरविश्वाचे ज्ञान असलेले तत्त्वज्ञ म्हणतात. या आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. सूत्र, शारीर,ऐंद्रिय, चिकित्सा, निदान, विमान, कल्प व प्रसिद्धीमध्ये सामान्य उपाय योजना असे विषय आहेत. बाकीचे चार विषय स्वयंस्पष्ट आहेत.

११
त्रिधातु-त्रिदोष

त्रिधातु-त्रिदोष उपपत्ति हे आयुर्वेदाचे न्यावर्तक वैशिष्ट्य आहे. वात, पित्त व कफ यांना त्रिदोष अशी संज्ञा आहे. यांना ‘धातु’ असेही म्हणतात. भारतीय वैद्यकाच्या त्रिपुराची उभारणी या बिंदुत्रयीवर आधारली आहे. ऋग्वेदात (मं. १/३/४६) ‘त्रिधातु’ हा शब्दच उपयोजिला आहे. वात, पित्त, कफ असा ‘त्रिधातु’ शब्दाचा अर्थ सायण भाष्यांत दिला आहे. त्रिधातु-त्रिदोष उपपत्ति ही केवळ वैद्यकीय स्वरूपाची नसून ती, सर्व विश्वाची गूढे उकलणारी, तत्त्व-शास्त्रातली एक गुरुकिल्ली आहे. सूक्ष्म जीवपेशीपासून तो सूर्यमालेपर्यंत सर्व घटना, त्रिधातु-त्रिदोष पद्धतीने एकेकाळी उलगडल्या गेल्या होत्या व पुनश्च त्या उपपत्तीच्या विनियोगाने आधुनिक विज्ञानातील आजचे अनेक कूट प्रश्न सुटतील यात तीळमात्र शंका नाही. वात, पित्त आणि कफ ही भारतीय विज्ञानातील एक मूलभूत त्रिपुटी आहे. हे तीन पदार्थ म्हणजे तीन महनीय तत्त्वे आहेत. वात, पित्त आणि कफ यांचे परिभाषक अर्थ अगदी निराळे आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वी, आप, तेज वायु या संज्ञादेखील लक्षणा शक्तीने अलंकृत असे शास्त्रीय संकेत आहेत. पंचमहाभूते ही मूलद्रव्याची (मॅटर) घटक तत्त्वे नव्हेत. पंचमहाभूते मूलद्रव्याचे वैशिष्ट्यूपर्ण अविर्भाव आहेत. वात शब्द ‘वा’ धातूपासून निघाला आहे. (वा-गतौ) वात शब्दाचा निरुक्त-अर्थ ‘गति’ असा आहे. वात शब्दाचा गति हा अर्थ, वातांचे एक प्रमुख लक्षण आहे, एक स्वभाव-विशेष आहे. गति हे वाताचे घटक द्रव्य नव्हे. गति हे एक गुण तत्त्व आहे. पित्त या शब्दाची उपपत्ति ‘तप्’ या धातूपासून झाली आहे. पित्त हे अग्नेय म्हणजे मूलत: अग्निजन्य आहे. तेजोमयत्व, अग्निमयत्व हा पित्ताचा गुण आहे. पित्त हे देखील द्रव्य नव्हे, एक गुण आहे. श्लेषमा म्हणजे कफ. श्लेषमा हा शब्द ‘श्लिष’ धातूपासून झाला आहे. श्लिष् धातुचा अर्थ अलिंगन देणे, समरस होणे, चिकटणे असा आहे. दोन पदार्थ एकत्र चिकटले की तेथे स्थिरत्व उत्पन्न होते. वाहात असलेला पदार्थ, गति थांबल्यावर, स्थिरता आल्यावर चिकट होतो. या चिकटपणांत गति थांबवून व आर्द्रकण आकर्षित करून त्यांना स्थिरतादेण्याची शक्ति असते. म्हणून श्लेष्मा म्हणजे कफ़ या शब्दामध्यें स्थिरता व आकर्षण या दोन्ही गुणांचा अंतर्भाव होतो. ‘चक्रपाणी’ या चरकावरील टीकाकारानें हे अर्थ स्पष्ट्पणें निर्देशिले आहेत.

तत्र निरुक्तया वातस्य चपलत्वं, पित्तस्य तापकत्वम्‌‌।

कफ़स्य्‌ उपश्लेषणत्वं, उक्तं भवति॥

गति, प्रेरणा व आकर्षण हे वात-पित्त-कफ़ाचे निरुक्तार्थ होत.

सु-श्रुत संहितेतल्या अकराव्या अध्यायांत वात, पित्त, कफ़ (श्लेष्मा) यांचे निरुक्तार्थ स्पष्टपणें उल्लेखिले आहेत. आयुर्वेदीय परिभाषेंत वात, पित्त, कफ़ ही तीन द्रव्यें नसून, गुण-विशेष आहेत.

१२ दोषच - गुण नव्हे

या तीन गुण-तत्त्वांना ‘दोष’ अशी संज्ञा आहे. या संज्ञेमुळें तिच्या ‘यथार्थ’ प्रतीतींत अनेक विक्षेप निर्माण झाले आहेत. दोष म्हणजे दूषित करणारा गुण. वात, पित्त, कफ़ हीं तत्त्वें विषम झालें कीं शरीराला दूषवितात; म्हणून त्यांना ‘दोष’ ही संज्ञा आहे. ते स्व-रूपांत दोष नाहीत. नुसती शुद्ध तत्त्वें आहेत. सांख्य तत्त्व-ज्ञानामध्यें सत्व, रज, तम हे प्रकृतीचे गुण, म्हणजे ‘धर्म’ नव्हेत, प्रकृतीचे रूप (form) आहेत, स्व-रूपभूत आहेत. प्रकृति म्हणजेच गुण.

गुणा एव प्रकृति शब्द वाच्या, न तु तदतिरिक्ता प्रकृतिरस्ति। - (योग वार्तिक २, १८)

प्रकृति व गुण यांत,फ़क्त दृष्टिकोनामुळे भेद-प्रतीति होते. वास्तवतेत जी प्रकृति तीच गुण - ‘रूप’ आहे प्रकृतीची साम्यावस्था असताना गुणांची व गुणभेदांची प्रतीति नसते. सांख्य तत्त्वज्ञानाची ही भूमिका आयुर्वेदांत अंतर्भूत आहे. मानवी शरीराची प्रकृति पूर्णपणें निरामय, स्वास्थमय असली कीं ‘निर्दोष’ असते. वात, पित्त, कफ़ हे दोष अभिव्यक्त होत नाहीत. त्यांना रूप-सिद्धि मिळत नाही. त्यांना गुण म्हणण्यापेक्षा ‘दोष’ म्हणणेंच अधिक सयुक्तिक आहे. कारण साम्यावस्था दूषित झाल्याचीं तीं ‘प्रमाणेंच’ होत. सांख्य-दर्शनांत देखील सत्व, रज, तम यांना गुण म्हणणें हें तितकेसें योग्य नाहीं. त्यांनाहि ‘दोष’ म्हणणे सर्वथैव समुचित आहे. कारण मूल प्रकृतीच्या दोष-संचलित, दूशःइत, साम्यच्युत अवस्थेचे ते निदर्शक आहेत. दूषित प्रकृतींत उद्‌भवणारें ते दोषच असणार. गुण कसें? सांख्य-प्रवचन-सूत्र, वृत्तिसार व योगवार्तिक हे सांख्य-दर्शनाचे आधार-ग्रंथ पाहिले कीं गुण हे प्रकृतीहून निराळे नाहींतच; व निराळे झालेसे दिसतात; तेव्हा ते ‘दोष’ असतात, गुण नसतात; हें सूक्ष्म दृष्टीच्या अभ्यासकाच्या लक्षांत आल्याशिवाय राहाणार नाही. आयुर्वेद प्रणेत्यांनी वात, पित्त, कफ़ यांना ‘दोष’ म्हणण्यांत सांख्य-दर्शनांतील परिभाषेवर एक आवश्यक व समुचित संशोधन केलें आहे. वात, पित्त, कफ़ यांना ‘दोशःअ’ कां म्हणतात हें यांवरून स्पष्ट होईल. गुण अवस्थेंत असतांना त्यांना अस्थित्व नसते. दोष झाल्यावरच ते उदित होतात. भगवद्गीतेंत त्रिगुणातीत अवस्था व निस्त्रैगुण्ययाचें वर्णन आहे. त्याचा अर्थ अंत:करणाची साम्यावस्था असा आहे. सत्व गुणदेखील बंधनात्मक आहे रजोगुण व तमोगुण हें तर बंधन-स्वरूपच आहेत. सत्व, रज, तम हे तिन्ह गुण - म्हणजे दुर्गुण किंवा दोष आहेत. गुण नव्हेतच. रजो-गुण हा हालचाल, गति व क्रियाशीलता दर्शवितो - तो वाताचा प्रतिनिधि आहे. सत्व-गुण तेज दर्शवितो, तो पित्ताचा प्रतिनिधि आहे व तमोगुण स्थिरता दर्शवितो म्हणून कफ़ाचा प्रतिनिधि आहे. सत्व, रज, तम यांना गुण म्हणणें म्हणजे विपर्यासाची अति सीमा आहे. सांख्यदर्शनाची व आयुर्वेदाची तात्विक भूमिका ध्यानांतघेतल्यावर वात-पित्त-कफ़ांना दोष म्हणणें कसें तर्कशुद् आहे हें कळून येईल. वैद्यो दोषदृक्‌ भवेत्‌। - वैद्याचा मुख्य ‘गुण’ म्हणजे त्याने दोषदृष्टि जागृ्त ठेवली पाहिजे. हा विरोधाभात्मक सिद्धांत म्हणजे केवळ शब्दालंकार नसून आयुर्वेदविद्येंतलेंएक महनीय तत्त्व आहे. दोषांचा स्थानपरत्वें आश्रय झाला म्हणजे त्या त्या स्थानांत रोग उत्पन्न होतो. बिघडलेला दोष पोटाचा आश्रय करतो तेव्हा, गुल्म, उदर, विषूचिका, अतिसार हे रोग होतात. बिघडलेला दोष बस्तीचा आश्रय करतो तेव्हा अश्मरी, मेह, मूत्राघातइत्यादि रोग होतात. रोगांच्या ज्ञानापेक्षा, रोगांना कारक असणार्‍या दोषांचे ज्ञान होणें अधिक मूलगामी आहे. विसदृश वाटणार्‍या अनेक रोगांत दोष एकच असं कतो व चिकित्साही एकच होऊं शकते. उदाहरणार्थ: ‘रक्ती मूळव्या, अधोग-रक्तपित्त, स्त्रियांच्या योनि्मार्गें जाणारें रक्त या तिहींतील दोषवायु व पित्त यांचा प्रकोप हा एकच आहे, म्हणून त्या तिन्ही रोगांची चिकित्साहि एकच आहे.’ प्रदर चिकित्सेंत चरकाने ही गोष्ट खालील श्लोकांत सांगितली आहे -

रक्तातिसारिणाम्‌ यच्च तथा शिणित पित्तिनाम्‌।

रक्तार्शसाम्‌ च यत्‌ प्रोक्तम्‌ भेषजं तच्चकारयेत्‌

रोगचिकित्सेपेक्षा दोष-चिकित्सा अधिक व्यापक स्वरपाची, मूलगामी व शास्त्रीय स्वरूपाची आहे, हे यावरन सुस्पष्ट हो्तें.

 

१३ त्रि-धातु, पंचमहाभूतें व ज्ञान-विश्वाची एकात्मता

वात, पिता, कफ़ यांना ‘धातु’ अशीहि संज्ञा आहे. कारण तीं तत्त्वें देह धारणेला आवश्यक आहेत.

शरीर दूषणात्‌ दोष: धातवो देह धारणात्‌ - (श. पु. पांच ४४)

दोष आणि धातु हे दोन्ही शब्द एकाच अर्थानें वापरले गेल्याचीं विधानें आयुर्वेदीय वाङ्‌मयांत अनेक ठिकाणीं मिळतात.

रोगस्तु दोष-वैषम्यं दोष-साम्यं अरोगता। - (अ.हृ.सु. १-२७)

विकारो धातु-वैषम्यं, साम्यं प्रकृतिरुच्चते। - (च.स. ६-४)

त्रिदोष व त्रिधातु हे गुण आहेत. गुण-तत्त्वें आहेत. घटक द्रव्यें नाहीत. या त्रिधातूंचा (त्रिदोषांचा) उगम पंचमहाभूतांत आहे. ‘वात’ हें तत्त्व वायु व आकाश या दोन धातूंपासूनम्हणजे धारणातत्त्वापासून, उत्पन्न होतें. पित्त तेजापासून उत्पन्न होतें. श्लेष्मा (कफ़) हा पृथ्वी आणि आप या दोन तत्त्वांपासून उत्पन्न होतो. मूलद्रव्य किंवा मूलप्रकृति याला इंग्रजीत ‘मॅटर’ म्हटलें जातें. पंचमहाभूतें हीं या मूलप्रकृतीची विशिष्ट भाव रूपें होत. वात-पित्त-कफ़ हे या पंचमहाभूतांचे भौतिक गुण होत. हे तीन गुणसजीव व निर्जीव अशा सर्व जातमात्राचे, सर्व अवस्था-विशेष ठरविणार्‍या तीन महनीय शक्ति आहेत. त्रिदोष किंवा त्रिधातु या केवळ मानवी शरीराचेस्वास्थ्य किंवा अस्वास्थ्य ठरविणार्‍या तीन कल्पना नसून सर्व विश्वाच्या कारक व नियामक अशा त्या विभु शक्ति आहेत. कोठल्याही जीवमान शरीरांत सामान्यत: तींन लक्षणेंदिसतात. हालचाल, उष्णता व आर्द्रता. झाडाच्या पानांची हालाचाल वायूनेंच होत असलेली आपण पाहातो. जीवमान शरीरांतील हालचालही वायूनेंच होत असावी असा सयुक्तिक तर्क आयुर्वेदाच्या आद्य द्रष्ट्यांनी केला असावा. उष्णता सूर्यापासून मिळते. सूर्य व अग्नि यांच्या रंगाचे व गुणाचे तत्त्व म्हणजे पित्त; श्लेष्मा म्हणजे कफ़; याचा रंग कांहीसाचंद्रासारखा असतो. वायु, सूर्य व चंद्र यांचे मानवी शरीरांतील प्रतिनिधि म्हणून वात, पित्त, कफ़ अशी उपपत्ति आद्य वैदिक द्रष्ट्यांनी बसविली असावी. विश्वाची, विश्वज्ञानाची व ज्ञानविश्वाची एकात्मता सिद्ध करणारा एक अभिनव सिद्धांत विश्व-विख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन यानें इ.स. १९५४ च्या जानेवारींत प्रस्थापित व प्रकट केला आहे. त्याला Unified Field Theory अशीसंज्ञा आहे.विश्व-ज्ञानाच्या व ज्ञान-विश्वाच्या एकात्मतेची ही नवी प्रतीति, त्रिधातु-त्रिदोष द्रष्ट्यांना, आथर्वण ऋषींना, आत्रेय, पुनर्वसु, धन्वंतरी, दीविदास व चरक-सुश्रुत यांना झाली असलीच पाहिजे. एरवीं ही उपपत्ति सुचण्याचा संभवच नाही. वात, पित्त, कफ़ या त्रिधातुंचे पांच पांच पोटभेद करण्यांत आले आहेत. पंच प्राण किंवा पंच वायु प्रसिद्धच आहेत. पिताच्या पांच भेदांपैकी आलोचक, साधक व रंजक हे भेद विशेष महत्त्वाचे आहेत. आलोचक पित्त म्हणजे डोळ्यांन शक्ति देणारे पित्त. साधक म्हणजे इच्छित क्रिया साधणरी शक्ति. रंजक पित्ताने त्वचेचा, केसांचा व नखांचा रंग निर्णित होतो. पाचक व भ्राजक पित्तांचे कार्य पचन व त्वचा सतेज करणे. चरकांतील वात-कला-कलीय अध्यायांत त्याचप्रमाणें सुश्रुतांतील व्रण प्रश्नाध्यायांत वात, पित्त, कफ़ाचे जें विवरण आहे त्यावरून ही तत्त्वत्रयी, केवळ मानवी शरीरांतील घटनांची निष्पादक नसून एकंदर विश्वांतील सर्व व्यापारांची नियंत्रक, उत्पादक व संयुजक शक्ति आहे, हें स्पष्ट होतें. वायु, सूर्य (अग्नि) व चंद्र हे वात, पित्त, कफ़ाचे प्रकृतींतले प्रतिनिधि होत.

अग्निरेव शरीरे पित्तांतर्गत: कुपिताकुपित:शुभाशुभानि करोति। - च.सू.अ. १२

सोम एव श्लेष्मांतर्गत: कुपिताकुपित:शुभाशुभानि करोति। - च.सू.अ. १२

लोकत्रय, अग्नित्रय, वेद-त्रय, देव-त्रय, गुणत्रय, प्रणवाचें, ॐकाराचे, अ, उ, म हें अवयव-त्रय, कालत्रय, देह-त्रय, शक्तित्रय, ऋणत्रय, या त्रिपुटि भारतीय संस्कृतींत व तत्त्वशास्त्रांत सुप्रतिष्ठित आहेत. चरकाच्या सूत्रस्थानांत ‘तिस्त्रैशणीय’ असा एक अध्याय आहे. त्या अध्यायांत प्रत्येक मनुष्यानें तीन पुरुषार्थ साधावे असें सांगितलें अहे. प्राणेषणा, धनेषणा व परलोकेषणा या तीन ईषणा सफ़ल करणे हें मानवी जीवनाचें उद्दीष्ट आहेअसें तेथें सांगितले आहे. चरकाने रोगही तीन प्रकारचे सांगितले आहेत. पण चरकाचे वर्गीकरण आयुर्वेदाच्या मूल-भूमिकेस अधिक अनुरूप व सु-संगत आहे. पंच महाभूतें हीं देखील मूल द्रव्यें नव्हत, एकाच मूलद्रव्याच्या, मूलप्रकृतीच्या त्या पंच-विध अवस्था आहेत. वात म्हणजे गति, पित्त म्हणजे शक्ति, श्लेष्मा म्हणजे स्थिति. गति, शक्ति आणि स्थिति ही आधुनिक पदार्थ-विज्ञान शास्त्रांतीलअधिष्ठान-भूत तत्त्वत्रयी आहे. अरिस्टॉटल व न्यूटन हे मूल-प्रकृतीला ‘इनर्ट’ म्हणजे अ-गतिक मानीत. पण आयुर्वेदाचे आद्य प्रणेते सुमारें तीन हजार वर्षांपूर्वी मूलद्रव्य हें केवळ स्थितिमय नसून गतिमान व शक्तिमान आहे, असें निसंदेहपणें मानीत आले आहेत. इ.स. १९५३-५४ मध्यें, अमेरिकेंत, प्रिंस्टन येथें सापेक्षतावादाचा जनक आइनस्टाईन यांच्याशी झालेल्या माझ्या अनेक प्रदीर्घ संभाषणांत सांख्य=दर्शनांतील मूल-प्रकृति, सत्व, रज, तम हें गुणत्रय आणि सांख्यदर्शनावा आधारलेल्या आयुर्वेदीय त्रिधातु उपपत्तीचा उल्लेख मी सहज ओघाने त्यांच्याजवळ केला होता. आयुर्वेदांतल्या म्हणजे भारतीयस्वास्थ्य शास्त्रांतल्या ‘त्रिधातु’ कल्पनेला पदार्थविज्ञानाच्या मौलिक तत्त्वज्ञानाचा आधार असल्याचें मी सांगतांच, आइनस्टाईन आश्चर्यचकित झाले. पदार्थविज्ञानावर अर्थात्‌ त्यांची असीम श्रद्धा होती. त्या शास्त्रावर आधारलेलें सिद्धांत त्यांना केव्हांही विचारणीय वाटत. आयुर्वेद व पदार्थविझ‘जान यांचा संबंध इतका मूलगामी असूं शकेल अशी कल्पना देखाल कोणी सहजा-सहजी करूं शकणार नाहीं. वैदिक संशोधन मंडळाचे (पुणें० सुप्रसिद्ध संशोधक प्रा. चिं. ग. काशीकर यांनी रूपांतरित केलेला, ज्यूलिअस जॉलीचा जर्मन भाषेतला महान्‌ ग्रंथ, ‘भारतीय वैद्यक’ व डॉ. व्ही. गोरे यांचा सत्तर पानांचा मार्मिक प्रबंध, या दोन ग्रंथांचा निर्देश प्रस्तुत संदर्भात आवश्यक हे. सर पी, सी. रे, जे. एफ़. रायली, आर, टील, ठाकूरसाहेब, कविराज सेन यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथांत, जागोजाग आलेलें विवेचन, आयुर्वेदाची पदार्थविज्ञानात्मक प्रतिष्ठा स्पष्टपणें विशद करणारें आहे. आल्‌बर्ट ऐन स्टाईन यांचा अखेरचा शोध असा आहे. ‘ परमाणूच्या आंतर-गर्भात असणारें विश्व व अनंत अवकाशाच्या पलीकडे असणारे विशाल विश्व-समूह या दोन्ही टोकांना एकाच नियमावलीने निबद्ध केले आहे. ज्ञानाच्या क्षेत्राचे सर्व विभाग, सर्व वलयें, सर्व बिंदु एकमेकाशी सुसंबंद्ध आहेत. अणु-विज्ञान व अतिगोल हीं दोन्हीं शास्त्रे परस्पर संबंद्ध आहेत. जगांतल्या सर्व शास्त्रांचे सामानाधिकरण्य एकच आहे.’ संक्षेपत: त्यांच्या महनीय शोधाचें स्थूल दिग्दर्शन वरील अवतरणचिह्नांत आलें आहे. त्यांनी उच्चारलेल्या इंग्रजी वाक्यांचे हें शब्दश: भाषांतरच मी दिले आहे. हा उल्लेख येथें करण्याचें कारण असें कीं, आइन्‌स्टाइनचा अंतिम शोध हें वैदिक तत्त्वज्ञानाचें, दर्शन ग्रंथांचें व आयुर्वेद विद्येचें आद्य गृहीत कृत्य आहे. व्यास, वसिष्ठ, गौतम, धन्वंतरी यांना, एकंदर ज्ञानाचीएकात्मता विज्ञात होती. म्हणूनच, पदार्थविज्ञानापासन अध्यात्मापर्यंत प्रतेक दर्शनशात्राची सुसत्र व सुसंगत उभारणी त्यांनी केली आहे. आअर्य-वैद्यक हें पदार्थविजञान शास्त्रावर आधारित आहे. हा एक ज्ञानक्षेत्राच्या एकात्मतेचा पुरावाच होय असें आल्बर्ट ऐन‌स्टाईनला वाटलें. आर्ष द्रष्ट्यांनी सृष्टीचा विकासक्रम ‘त्रिवृत्‌करण’ या तत्त्वावर आधारलेला होता. पुढें त्यांचें रूपंतर पंचकरणांत झालें. त्रिवृ्त्करण हें सांख्य गुण-त्रयाचें मूल स्वरूप होय. सांख्य तत्त्वशास्त्रांतले सत्व, रज, तम हे त्रैगुण्य म्हणजेंच आयुर्वेदातल्या वात, पित्त, कफ़ या तात्विक पूर्वस्वरूप आहे. आयुर्वेदाचे मूलसिद्धांत, सांख्य तत्त्वज्ञानावर अधिष्ठित आहेत. सांख्य तत्त्वज्ञान हें, आधुनिक पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची दे्खील ऐतिहासिक गंगोत्री आहे आजकालचा विकास-वाद (Theory of Evolution), प्रकृति्तत्त्व (Matter) व तिची वैशिष्ट्यें, अणु-वाद, स्वभाव-वाद या सर्व उपपत्ति सांख्य दर्शनांत प्रथम अवतीर्ण झाल्या. व नंतर अरबस्थान, ग्रीक, रोम मधून सर्व पाश्चिमात वुज्ञानक्शेत्रांत प्रसृत झाल्या.

६ आयुर्वेदीय साम्यवाद!

आयुर्वेद म्हणजे शरीरांतला साम्य-वाद आहे असें मला वाटतें. रीरांतल्या जेवपेशी, सप्तधातु व उपधातु,एकाद इंद्रिये व आत्मा यांच्या गति, स्थिति व कृति या सर्वांमध्ये विधायक सह-योग निर्माण करणें हें आयुर्वेदाचें इद्दष्ट आहे. शरीरांतल्या अनंत जीवपेशी व इतर सर्व घटक मिळन एक समाज आहे; सम्ष्टि आहे. त्यांच्यामध्ये सह-योग व शांति असणें याचें नांव स्वस्थता किंवा स्वास्थ्य. आयुर्वेदांत स्वास्थ्य ही केंद्र-वस्तु आहे, रोग नव्हे. सप्त धातूंचे म्हणजे देहाच्या धारणाशक्तींचें साम्य ही मलभूत आवश्यकता आहे. रस, रक्त, मांस, भेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे देहाचे धारक धातु आहेत. पुरीष, मूत्र व स्वेदहे तीन मल आहेत. पुरीष हा मल वायु व अग्नि यांचे धारण करतो. मूत्र व स्वेद यांचेकडेही विधायक कार्य आहे. ते शरीरांत असतांना व बाहेर जाऊनही, शरीरांतल्या साम्य-स्थितीला उपकारक कार्य करीतअसतत. रोगयापन हे त्यांचे कार्य आहे. आयुर्वेदीय चिकित्सा शास्त्राप्रमाणें रोगपरिहारक औषधें देतांना, दो, दूष्य, बल, काल, अनल, सात्म्य इत्यादींचा विचार अत्यावश्यक आहे. दोषांची विशःअमावस्था व रुग्णांची प्राणशक्ति किंवा धातुबल (Vitality) यांवर आयुर्वेदाचा विशेष भर आहे. केवळ रोग एवढाच एक विचारांत घेण्याचा विषय आहे असें आयुर्वेद मानीत नाह. रोगाची लक्षणें व रोग यांचेपेक्षा त्याचे मुळा्शी असणारे दोष-वैषम्य व धातु-विकृति याबद्दल आयुर्वेद चिकित्सा जागृत असते.

या्भि: क्रियाभिर्जायते शरीरे धातव: समा:।

सा चिकित्सा विकाराणाम्‌ कर्म तद्‌ भिषजाम् स्मृतम्‌॥

त्यागात‌ विषम हेतनाम समानाम्‌ चोपसेवनात्‌।

विषमा नानुबध्नंति जायंते धातव: समा:॥ -(चरक सत्रस्थान)

ज्या क्रियांनी शरीरांतले धातु सम राहातात त्या क्रिया म्हणजे व्याधीवरील उपचार होत. समत्व बिडवणार्‍या, विषमत्व उत्पन्न करणार्‍या हेतूंचा (कारणांचा) त्याग केलाव समत्व उत्पन्न करणार्‍या वस्तूंचें सेवन केलेळ कीं वैषम्य उत्पन्न होत नाहीं व धातु-साम्य ढळ राहातें (चरक सूत्रस्थान) रोग किंवा विकार कसा होतो? शरीरांत संचरणारा दोष प्रथम कुपित होतो. नंतर शरीरांत जेथें वैगुण्य असेल तेथे व्याधि उत्पन्न होते. कुपित होणें, म्हणजे उन्मार्गगामी होणें. स्वत:चें स्थान सोडून, मार्ग सोडून, दुसर्‍या ठिकाणी जाणें.

प्रकोपस्तु उन्मार्गगामिता।

कुपितानाम‌ हि दोषाणाम्‌ शरीरे परिधाविताम्‌।

यत्र संग: स्ववैगुण्यात्‌ व्याधिस्तत्रोपजायते॥

आंग्ल वैद्यकाप्रमाणें, बहुतेक सर्व रोग जंतु-जन्य आहेत असें मानिलें जातें. आयुर्वेदाप्रमाणें, जंतु-जनन हा धातु-वैषम्याचा परिणाम आहे. वात, पित्त, कफ़ यांची साम्यावस्था ढळली कीं दुसर्‍या विख्रुतींप्रमाणें जंतु-जननहीनिर्माण होते. जंतूंचा निर्देश चरक-सुश्रुतांत स्पष्ट आहे. जंतु-जनन हें रोग होण्याचे उपांत्य कारण असूं शकेल पण अंत्य कारण नव्हे. सूक्षतम जंतूंचा उल्लेख चरक व सुश्रुत दोघांनीही केला आहे. कोणत्याही रोगाचे अंत्य महणजे अखेरीचे, मुख्य, प्रवर्तक कारण त्रिधातु-वैषम्य किंवा त्रिदोष-प्रक्षोभ हें होय. द्वादश-क्षार चिकित्सा, होमिओपाथी इत्यादी सर्व वैद्यक-पद्धतींमध्यें वापरण्यात आलेलीं निदान तंत्रे आयुर्वेदांतील निदान तंत्रांइतकी मूलगामी नाहींत. रोगाचे मूल कारण शोधणें हें निदानशास्त्राचें उद्दिष्ट. होमिओपाथीमध्यें, लक्षणांवरून रोगाचें निदान करण्याची पद्धति प्रचलित आहे. ‘लिंगैर्व्याधिं उपाचरेत्‌।’ हा आर्यवैद्यकांतील सिद्धांत लक्षांत घेतला कीं होमिओपाथीच्या कांही मूलतत्त्वांचा अंतर्भाव भारतीय आयुर्विदांनी आपल्या चिकित्सा-शास्त्रांत केला होता हें स्पष्ट दिसतें.(प्रांतिक संमेलनाचे (१९५६) अध्यक्ष, वि. म. गोगटे म्हणतात त्याप्रमाणें, आयुर्वेदाचें ‘उपबृंहण’ आपण केलें पाहिजे. तडजोड व समन्वय चालणार नाहीं. ‘शिद्ध-मिश्र’ वाद निरर्थक आहे. तादात्म्यसंबंध घडल्यावर मिश्रता कोठें राहाणार? आयुर्वेद चिरशुद्ध आहे. खोटे अवयव गळतीलच.) आयुर्वेदीय चिकित्सा-शास्त्रांत औषधामध्यें पांच तत्त्वें कल्पिली असून त्यांचे भेद व परस्पर संबंध याबद्दल पुष्कळ चर्चा केली आहे. गुण, रस वीर्य, विपाक व प्रभाव हीं औषधामधली पांच तत्त्वें होत.


प्रत्यक्ष-वाद व प्रयोग-निष्ठा

चरक, सुश्रुतादि आयुर्विदांची प्रतिभा तत्त्वदर्शी व मूलगामी असली तरी प्रत्यक्ष अनुभवावरील त्यांचा कटाक्ष लक्षांत ठेवण्याजोगा आहे. चरकानें शारीर स्थानांतील सातव्या अध्यायांत, शरीरांतल्या मुख्य अवयवांचें वर्णन केलें आहे. हे अवयव प्रत्यकष प्रतीतींत येणारे आहेत. पणत्याशिवाय नऊशें स्नायु, सातशें शिरा, दोनशें धमन्या व एकशें सात मर्में इत्यादि दुसरे अवयव, दृश्य किंवा प्रत्यक्ष नसून केवळ ‘तर्क्य’ आहेत असें त्यानें स्पष्टपणें म्हटलें आहे. ‘तर्क्य’ शब्द वापरून त्यानें आपली प्रत्यक्षावरील निष्ठा आणि काल्पनिक वर्णनाबद्दलचासंशय व नादर, हळुवारपणें व्यक्त केला आहे. सुश्रुताचा खालील एक श्लोक, प्रत्यक्ष प्रमाणावरील त्याची अंतिम श्रद्धा प्रकट करतो. हेतु-वाद चर्चा, कार्य-कारण चर्चा यांना औषधाचे उप्योजन करताना अवास्तव महत्त्व देऊं नये.

प्रत्यक्ष लक्षणफ़ला: प्रसिद्धाश्च स्वभावत:।

नौषधीर्हेतुभिर्विद्वान्‌ परीक्षेत कथञ्चन॥ - सु. सू. अ. ४०

विद्वानानें औषधींचें परीक्षण, मूलत: प्रसिद्ध अस्लेल्या व प्रत्यक्ष अनुभवांत आलेल्या फ़लाप्रमाणें व गुणाप्रमाणें करावें. नुसत्या अनुमानित कारणांनी औषधांची परीक्षा करूं नये. चरक-सुश्रुतांची प्रत्यक्ष-निष्ठा व बुद्धि-निष्ठा, इतिहास-कालींदेखील मान्य होती. आर्ष वैद्यक योगनिष्ठ होतें, तसेअंच प्रयोग-निष्ठहि होतें. वाग्भटानें आपल्या अष्टांग हृदयांत एक श्लोक निविष्ट केला आहे. केवळ जुनें तें सोनें अशी अंधश्रद्धा आयुर्वेदांमध्ये केव्हांहि नव्हती. वाग्भट म्हणतात:

ऋषि-प्रणीते प्रीतिश्चेत्‌ मुक्‌त्वा चरक सुश्रुतौ।

भेलाद्या: किं न पठ्यंते तस्मात्‌ ग्राह्यम्‌ सुभाषितम्‌

‘केवळ पूर्व ऋषींनीं लिहिल्या एवढ्याच कारणासाठीं आदरणीयवाटत असतील तर भेड, हारित यांच्याच संहिता अभ्यासाव्या; त्या संहितांहून अधिक श्रेष्ठ, उपयुक्त व व्यवहार्य असलेल्या त्यांच्या नंतरच्या चरक-सुश्रुतांच्या संहिता कशाला वाचा?’ चरक-सुश्रुत हे भेल-हारित यांच्याहून अर्वाचीन आहेत; तरीहि त्यांची प्रत्यक्शःअ-प्रमाणावरील निष्ठा, त्यांचे प्रयोगकौशल्य व विशुद्ध विज्ञान-वाद या गुणांसाठीं भेलादि पूर्वसूरींपेक्षा ते अधिक आदरणीय व उपयोज्य आहेत, असें सांगून वाग्भटानें चरक-सुश्रुतांचाच नव्हे तर स्वत:चा, आयुर्वेदविद्येचा व भारतीय संस्कृतीचा, योग-प्रयोग-प्रधान व ज्ञान-विज्ञान-विशिष्ट दृष्टिकोन सिद्ध व प्रसिद्ध केला आहे. वृक्षांचा व पशूंचा आयुर्वेद, प्रयोग-निष्ठेमुळेंच जन्माला, नव्हे का?

वृक्ष आयुर्वेद

श्री शिवतंत्र-रत्नाकरांत ‘वृक्षायुर्वेद’ हें एक प्रकरण आहे. वृक्षांमधले रोगदेखील वात-पित्त-कफ़ या त्रिदोषांच्या प्रकोपामुळें, विषमतेमुळें उत्पन्न होतात, असा त्या तंत्राचा सिद्धांत आहे. वात-प्रकृतीचे वृक्ष व वनस्पति अतिशय संवेदन-क्षम असतात. ते साधारणत: जाडजूड नसतात. त्यांना फ़ळें-फ़ुलें कमी धरतात. पित्त-प्रकृतीचे वृक्ष व वनस्पति, सूर्याची उष्णिमा सहन करूं शकत नाहींत. त्या फ़िकट दिसतात. त्यांना फ़ांद्या कमी व फ़ळें फ़ार लवकर, किंबहुना अकालींच येतात. कफ़-प्रकृतीचे वृक्ष, धण-धाकट, फ़ुला-फ़ळांनी समृद्ध, लतावेलींनीं युक्त व सकस मुळें-पाळें असलेले, असे असतात. सर गजदीशचंद्र बोस यांनी लज्जवती, सूर्यसन्मुखी या व दुसर्‍या अनेक वन्स्पतींवर प्रयोग करून एकंदर वानस्पत्य व मानव्य यांचे भावना विषयक साधर्म्य विज्ञान-विशिष्ट प्रयोगपद्धतीनें सिद्ध करून ठेवलें आहे. आल्मोरा येथें सर जगदीशांचे शिष्य बोशीसेन व त्यांच्या पत्नी - या दोघांनी उभारलेली एक भव्य प्रयोगशाळा मीं सन १९४४ सालीं पाहिली होती. वृक्षायुर्वेदांतल्या अनेक कल्पनांवर त्यांचे प्रयोग आधारलेले असत. डॉ. बरबॅंक यांचें कॅलिफ़ोर्नियांतील उद्यान मीं पाहिलें आहे.तेथें देखील वृक्षायुर्वेदांतील सिद्धांत नियुक्त केले जातात. निष्कंटक गुलाब प्रथम तेथेंच सिद्धवण्यांत आला. डॉ. बरबॅंकचा ‘मानव हा एक वृक्ष आहे’, हा ग्रंथ प्रसिद्धच आहे. आयुर्वेद-विद्या, वृक्षायुर्वेदादिशाखांसह, स्वत:च्या अंतशक्तीनें जगांतल्या श्रेष्ठतम शास्त्रज्ञांचें लक्ष आकर्षित करीत आहें, हें पाहून मला धन्यता वाटाली. प्रयोग कुशल प्राचीन आर्यांनी पशु-आयुर्वेद तयार केला होता. हत्तीच्या आयुर्वेदाचा ग्रंथ पालकाप्य नांवाच्या लेखकानें लिहिला आहे.अश्ववैद्यकावर जयदत्ताचा ग्रंथ आहे. नकुलाचा अश्व-चिकित्सा हा ग्रंथ बराच प्रसिद्ध आहे. आंग्ल वैद्यकाच्या ज्ञान-लवानें दुर्विदग्ध झालेले कांही भारतीय लोक व आजचें भारत सरकार यांच्या उपेक्षा बुद्धीनें आयुर्वेद नष्ट होणार नाहीं; अशी सुदृढ श्रद्धा माझ्या ठिकाणीं निर्माण झाली आहे. मानव व सर्व जात-मात्र, पंचमहाभूतांच्या विकृति आहेत. त्रिधातु-त्रिदोष उपपत्ति हीच उत्क्रांति शास्त्राची, विकास योगाची मूल त्रिपुटि आहे. वैदिक आयुर्वेदाचाहा सिद्धांत सर्वमान्य होण्याच्या मार्गावर आहे.

विसर्गदान विक्षेपै: सोम-सूर्यनिला यथा।

धारयंति जगद्देहं कफ़-पित्तानिलास्तथा॥ - सुश्रुत सूत्राध्याय २१-७

 


प्रस्तुत प्रकाशन

माधवनिदान या ग्रंथाचें मराठींत उत्कृष्ट रूपांतर डॉ. गणेशपंत गर्दे यांनीं करून ठेवल्यामुळें भिषग्‌ वृत्तीनें चरितार्थ चालवणार्‍या वैद्यवर्गावर आनंत उपकार झाले आःएत. प्रत्यहिं उपयुक्त असलेला असा हा महान्‌ ग्रंथ मरठी भाषेंत अवतरल्यामुळें रुग्णचिकित्सकांप्रमाणें सर्वसामान्य रुग्णांनाहि स्वत:च्या रोगाचे निदान करण्याचीनसली तरी ‘कळण्याची’ शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची भाषाशैली प्रगल्भ व प्रसन्न, अर्थवती, रसवती व ओघवती आहे. ते एक अभिजात कवि म्हणजे ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ आहेत - याची साक्ष त्यांनीं योजलेल्या पदोपदीं व पंक्ति-पंक्तींत मिळते. श्री आणि सरस्वतीप्रमाणेंच प्रज्ञा आणि प्रतिभा या देखील ‘निसर्ग-भिनास्पद’ आहेत. त्यांच एकत्र अधिवास क्वचितच असतो. श्री. गणेशपंत यांचे ठिकाणीं प्रज्ञा व प्रतिभा, श्री व सरस्वती,बुद्धियोग व भक्तियोग, एकांतवय्त्ति व लोकांतस्थिति अशा परस्परविरोधक द्वंद्वांची उपस्थिति होती. विरोधांची व विरोधकांची अ-खंडित उपस्थिति हा महापुरुषांचा व्यावर्तक विशेष असतो. परमेश्वराचें स्वरूप असेंच नाहीं का? त्याच्या ठिकाणीं सर्व विरोधांचा व विरोधाभासांचा परिहार व समन्वय स्वयंसिद्ध असतो. भयकृत्‌ व भयनाशन्‌, अणु व बृहत्‌, कृश वस्थूल, गुणभृत व निर्गुण हे भगवंताचें वर्णन श्रीविष्णुसहस्रनाम म्हणतांना आपणा सर्वांच्या मुखांतून होतच असते. विष्णुसहस्रनामाचें श्री. गणेशपंतांनी एक उत्कृष्ट, अर्थगंभीर व रसमधुर रूपांतर मराठींत केले आहे. त्याचें नांव ‘ईशगुणादर्श’. ३०/४० वर्षांपूर्वी कित्येक कीर्तनकारहें मराठी रूपांतर मुखोद्‌गत करीत. अनुशासन पर्वांत पितामह भीष्मांणीं हे दिव्यस्त्रोत्र युधिष्ठिराला सांगितलें आहे. महाभारतांतल्या रत्नपंचकांपैकी हें एक स्त्रोत्र असून लोकमान्य टिळकांनी त्याला ‘भक्तिकोश’ अशी संज्ञा दिली आहे. आद्य श्री शंकराचार्यांचे विष्णुसहस्रनामावरील भाष्य हें एक अस्वतंत्र उपनिषदच आहे. अलिइकडे श्रीविष्णुसहस्रनाम लोकांच्या स्मरतींतून गळल्यासारखें झालें आहे. म्हणून मुदाम त्याचें महत्त्व मी येथें निर्दिष्ट करीत आहे. माझ्यावर श्रीविष्णुसहस्रनामाचे अनंत उपकार आहेत, एवढें सांगितल्याशिवाय राहावत नाहीं. माझ्या मतें, विष्णुसहस्रनामाच्या अखंड चिंतनानेंच - श्री. गणेशपंत ह्यांच्या ठिकाणीं भगवंताच्या अन्योन्य-विरोधक अशा कांही सद्‌गुणांचा व विशेषांचा, ठळक प्रमाणांत प्रादुर्भाव झाला असावा. श्री. गणेशपंतांचा जन्म भाद्रपद वद्य १४ शके १७७७ (इ.स.१८५५) या दिवशीं झाला व ता. २ जुलैअ १९१६ या दिवशीं त्यांचा वैकुंठवास झाला. एकूण ६१ वर्षाम्चें त्यांचें जीवन; या अल्पकालांत त्यांनीं केलेलें महत्कार्य महाराष्ट्राच्या चिरस्मरणांत कृतज्ञतापूर्वकराहील, इअतकें तें दिव्य-भव्य आहे. त्यांनीण ‘वाग्भट’ या आयुर्वेदाच्या एका अधिष्ठानभूत ग्रंथाचें सर्वोत्कृष्ट मराठी भाषांतर केलें आहे. त्या ग्रंथाची चौतीस पानांची प्रदीर्घ प्रस्तावना ही एक प्रक्षोभक विचारांचीसंहिताच आहे. अगदीं आज देखील त्यांच्या कांही विधानांवर प्रखर टीका केली जात असते. त्यांनी केलेलें ‘माधवनिदाना’चे प्रस्तुत मराठीं रूपांतर म्हणाजे आयुर्वेदीय मराठी वाङ्‌मयांतील एक बहुमोल ठेवा आहे. आयुर्वेदाचें पुनरुज्जीवन हें तर त्यांचें जीवनकार्यच होतें. वैद्यवृत्तीच्या व्यवसायांत त्यांनीं सेवाधर्माची एक परमोच्च श्रेणी व परंपरा निर्माण केली आहे. केसरीवृत्त, वसंत व्याख्यानमाला, शिवजयंति, गणपति उत्सव या व इतर सर्व; लोकमान्यांच्या राष्ट्रीय संस्था व आंदोलनें; यांचे श्री. गणेशपंत हे एक प्रमुख पुरस्कर्ते व प्रचारक होते. त्यांचें महाराष्ट्रप्रेम, महाराष्ट्रीय संस्कृतिबद्दल त्यांना वाटणारी पराकोटीची आत्मीयता, आजच्या क्षणाला तारी, अतीव स्फ़ूर्तीदायक व उद्‌बोधक ठरेल. लोकमन्य टिळक म्हणतांत, “पुण्यापेक्षा मुंबईसच जर श्री. गणपतरावजी यांनीं वैद्यकीच्य धंद्यास सुरवात केली असती तर त्यांच्या अंगच्या गुणांचें चीज अधिक झालें असतें. पण महाराष्ट्राची यांना विशेष आवड असल्यामुळें मुंबईपेक्षा पुण्यासच राहून वैद्यकी करणें त्यांना अधिक प्रशस्त वाटलें.” त्यांचें बंधु विद्वत्‌श्रेष्ठ बाबा गर्दे यांचें नांव महाराष्ट्रभर विख्यात आहे. गीतपंचदशी व गीतामृतशतपदी ह्या त्यांच्या ग्रंथांतील पदें आमच्या लहानपणीं कित्येकांच्या तोंडीं असत. श्रीयुत गणेशपंतांचें ज्येष्ठ चिरंजीव कृष्णाजीपंत ऊर्फ़ दादासाहेब हे माझे गेल्या वीस वर्षांपासून निकटचे स्नेही आहेत. त्यांना, वडिलांपमाणेंच वैद्यकाची व आध्यात्मविषयाचीहि विशेष गोडी आहे. श्री. दादासाहेब व श्रीज्ञानेश्वरभक्त जगन्नाथ महाराजपंडित यांचेबरोबर मी आध्यात्मिक विषयांची, महाराष्ट्रीय संत वाङ्‌मयाची व लोकमान्य टिळकांच्या जीवनांतील अनेक अद्‌भुत प्रसंगांची चर्चा व सुखसंवाद करण्यांत तासन्‌ तास मोठ्या आनंदानें घलविले आहेत. श्री. दादासहेबांचें ज्येष्ठ चिरंजीव डॉ. रघुनाथराव हे योगविद्येंत चांगलेच प्रगत आहेत. आजोबांची आयुर्वेदनिष्ठा, सेवावृत्ति व अंतर्मुखता त्यांचें ठिकाणीं भव्यप्रमाणांत उतरली आहे. त्यांनीं सूर्योपासना, योगासनें, चिकित्सा कौमुदी इत्यादि अत्यंत महत्त्वाचीव उपयुक्त पुस्तकें लिहिलीं आहेत. त्यांना मी ‘आचार्य’ रघुनाथराव’ म्हणून संबोधित असतं. कारण विविध शास्त्रार्थ एकत्र करणें, दुसर्‍यांना तो आरणांत आणण्यास प्रवृत्त करणेंव मुख्य म्हणजे तो स्वत:च्या आचरणांत प्रथम बिंबवणें, ही आचार्यपदाची लक्षण-त्रयीत्यांचे टिकाणीं स्पष्टपणें प्रकट झालेली आहे.

आचिनोति च शास्त्रार्थान्‌।

अन्यान्‌ आचारयत्यपि॥

स्वयमाचरते चैव।

तस्मात्‌ आचार्य उच्यते॥

स्वावलंबन, शुचिता व सत्यनिष्ठा हे गुण त्यांचे टःइकाणीं ठळकपणें प्रतीत होतात. ‘सार्थ माधवनिदान’ या प्रस्तुत ग्रंथाचें पुन: प्रकाशन आचार्य रघुनाथरावांनींच मोठ्याधडाडीनें व कर्मकौशल्यानें पार पडलें आहे. आपल्या पितामहांचें त्यानीं हें एक चिरस्थायी वा्‌मयश्राद्धच केलें आहे. महाराष्ट्रीय जनताहि, या संतर्पणविधीमुळें कायमची संतुष्ट व उपकृअ झाली आहे. लोकाश्रय हीच खरी शक्ति आहे. ‘लोक हाच खरा आचारय’ असें म्हणणारे चरक-वाग्भट लोकशाहीचे एकनिष्ठ उपासक होते. आपण सर्व महाराष्ट्रीय लोक या ग्रंथावर सुवर्णाक्षता उधळूं या. ही अष्टांगी प्रस्तावना, माझ्या अष्ट अंगांसह भगवान धन्वंतरींच्यापुण्य-चरणीं विनत अहे. आयुर्वेद हें भारताचें राष्ट्रीय वैद्यक होईपर्यंत, विध्याद्रीप्रमाणें, आम्हीं स-अष्टांग, ‘दण्डवत्‌’, श्रींच्या चरणीं पडून राहाण्यांतच, धन्यता मांनू!

- धुं. गो. विनोद

श्री शंकराचार्य पुण्यतिथि

वैशाख शुद्ध पौर्णिमा, शके १८७९

ता. १३ मे १९५७

श्रे सिद्धाश्रम, पो. नारंगी, ता. अलिबाग, जि. कुलाबा.

ॐ तत्‌ सत्‌

-----------------------------

पुस्तकाचे नाव: माधव निदान

लेखक: माधवाचार्य मराठी

भाषांतर: श्री. गणेशपंत गर्दे

प्रस्तावना: न्यायरत्न विनोद, एम्.ए.पी.एच्.डी.

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search