अभंग

द्रव्य वा शरीर, प्रेम ते ह्यावरी। सर्व जनता करी भ्रांति योगे।

ऋणानुबंधाचे - सारे लागे बांधे।

तेथ नसायाचें खरें प्रेम ॥

दिल्या घेतल्याची - दुनिया सारी असे।

तागडीचे वसे - राज्य येथे ॥

निष्काम भक्तीचे पुष्प माझें तुला।

सये - अर्पायाला येथ आलो ॥३६॥

 

केतकीच्या पोटी विषारी नागिण।

कमलिनी कर्तन करी भृंग ॥

किडा उंबरात - प्रेमात वासना।

सदा असावी ना मृत्यू लोकीं ॥

परी अनंतते जी माझी ही भक्ति।

बहु मोल संपत्ति दिव्य तीच ॥

वासनेचा वास तिला न येईल।

त्रिकाल राहील निष्कलंक ॥३७॥

 

तुटली ही चांदणी दिवस असता काय।

निशा ती न होय - जरी अजुनी ॥

नुक्ताच दिनमाणे - मावळूनी गेला।

असे संधिकाला वेळ अजूनी ॥

तोंच काय आले घडूनी अनिष्ट।

होउ लागे कष्ट मनाला या ॥३८॥

 

जायबंदी लता कुणी केली सांगा।

जिला येत होता बहर आज ॥

माझ्या मनांतली तुझीत ती भक्ती।

अनंतते तुवा छेदियेली कां ती ॥

कडव्या कटाक्षाची तुझ्या ती करवत।

चरचरा कापींत जाई चित्ता ॥३९॥

 

चिमण्या माझ्या मना ।

तुझ्या राज्यांत या ॥

कशाला यावया ।

पाहिजे ती ॥

गुणगुणावी सदा आपुली सद्गीतें ।

तिच्या जीं न चित्ते जाणियेली ॥४०॥

 

दृष्टीच्या/ते त्या किरण चित्तास बोचती।

येई अश्रूतती सारखी ही ॥४१॥

 

स्मृतीमध्ये येता तशीच तो कोपना।

मिटूनीच नयना घेतले मीं ॥४२॥

 

जणूं आंतली ही मूर्ति ती अदृश्य ।

वाटते रहावी नेत्र मिटता ॥४३॥

 

नाचे चित्तापुढे सौंदर्य जे दिव्य।

सेव्य मला वाटे - तेंच विश्व ॥

सत्याची सुंदर हिरे नी माणिके।

भांडार लकाके अंतरांत ॥

हळूच जाऊनी तेथे ही कल्पना।

द्याया आणि जना तत्त्व द्रव्ये ॥४४॥

 

करू शकलों पाप या विना शासन।

दुजे असणार न - मला कांही ॥

इच्छा दुष्टाळली विटाळलें चित्त।

झालो मीं शासित तत्क्षणीच ॥

अनाचार घडला तोची अध:पात।

शिक्षा न लागत - अन्य कांहीं ॥४५॥

 

दिलाच्या दरियांत मारुनीया बुडी।

सदाची कां दडी दिली येथ ॥

नीघ कांठावरी - पुरे झाले स्नान।

कंटाळले मन - सये तुजला ॥४६॥

 

आशीर्वाद शाप - अन्नाचा कोळसा।

सहज झाला कसा घात माझा ॥

दुधामध्ये खडा - दुपारी अपरात्र।

वैधव्य वा येत लग्न घटिला ॥

जवळी अनंतता आलीशी वाटली।

तोंच नष्ट झाली - क्षणामध्यें ॥४७॥

 

पहिला रुकार तो ओंठिं या ठेवुनी।

सखी गेली वनीं निघूनीयां ॥

नुरे माझी स्मृति तिच्या आता मनी।

वनवास या जनीं मींच कंठी ॥४८॥

 

अधीर औत्सुक्य - चित्तीं धावेपळे।

चिमुरडें कळवळे निराशेनें ॥

गीताच्या गच्चीत - पाही येऊनिया।

अनंतता सया आली की न ॥४९॥

 

सूज येता जैसें रुंदावे गर्दन।

तसें तत्वज्ञान - तर्क दोषें ॥

निराळेंची असे - शरीर स्वास्थ्य जें।

अनुभवानें सजे खरे ज्ञान ॥५०॥

 

उद्याच्या जगाची काळजी कां मला।

चित्त जाळायाला - सदा सिद्ध ॥

अरुणास दिवसाची -फुलाला फळाची।

कल्पना ही कशी व्हावयाची ॥

आज उद्या मध्ये आहे अंतरपाट।

धरिलेला अफाट - अदृष्टाचा ॥

अद्य उदइकांत उभा तो अफाट।

असे अंतरपाट अदृष्टाचा ॥५१॥

 

स्मृतींच्या आसवांनी चित्त माझें झालें।

डंवरलेले डोळे तुझे जैसे ॥

अश्रू नेत्रीं तुझ्या गीते माझ्या मनी।

असें का चालते सये सांग ॥५२॥

 

निराश जीवाची मौज ही भेसूर।

तुला सांगणार - कोण कैशी ॥

काळवंडे रात्र माझ्याच हास्याने।

स्तब्ध ही स्मशानें - शांतीनें त्या ॥

वेताळ नाचती विचार जे माझे।

चितेचे जाळ ते - अंतरींचे ॥५३॥

 

जडावले डोके याच अंकावरी।

ठेवुनी क्षणभरी झोपुं दे ना ॥५४॥

 

नको दूर जाऊ आणावया पाणी।

टाक नेत्रांतुनीं मुखी अश्रु ॥

मृगजळा मागुनी धांवता जो सये।

माझ्या दु:खेंच ये - तुझ्या नेत्रीं ॥५५॥

 

एक एक क्षण - हात निटिलावरी।

केंस जो सांवरी तुझा ना तो ॥

मुखा वरती माझ्या वारा जो हालला ।

श्वास तो सांडला तुझाची ना ॥५६॥

 

बोबड्या बोलांनी तलाच बाहिले।

कां न येणें केले - तरी तेव्हा ॥

यौवनी वाहिले प्रेम तुझ्या पायी।

वार्धक्यात देई तुला भक्ति ॥

जन्मा जन्मी असे कितीकदां केले।

करुणा न येतसे - कशी तुजला ॥५७॥

 

ओठांत हे हांसू डोळयांत हे आसूं।

नका कोणी हंसू विरोधास या ॥

डोक्यांत वादळ विचारांचे चाले।

पर्जन्य आणिले नेत्रिं त्यानें ॥

परी या हृदयांत माझे प्रेम फुलें।

सुगंध दरवळे हास्य रुपें ॥५८॥

 

कळवळे हे मन असे करुणोद्गार ।

काढुनी अखेर स्तब्ध होई ॥

फत्तराला कधी दया नये मुळी ।

वनीं कीं राउळी असूं द्या तो ॥

कसला दगडी देव बसलात घेउनी ।

द्या तया फेंकुनी समुद्रांत ॥५९॥

 

दिव्य तेजाच्या त्या तरळल्या तिरिपेनें ।

सर्व माझी कवनें दूर नेली ॥

प्रतिभा, वाणी तशी तत्त्व वचनें सारी।

वायुनें दिशांना फेंकिली ती चारी ॥

आत्म्यात सौरभ शुद्धभक्तीचा या।

लागला नाचाया - भाग्य योगे ॥६०॥

 

प्रकार प्रेमाचे पाहुनी भोंवती।

अंतरींची खंती सदा वाढे ॥

द्रव्य वा शरीर, प्रेम ते ह्यावरी।

सर्व जनता करी भ्रांति योगे ॥

दोन आत्म्यांचे जें दिव्य एकीकरण।

प्रेम ते चुंबन अतींद्रिय ॥६१॥

 

चक्र ने क्रम, विराट कालाचा।

असा चालायाचा निरंतर ॥

जन्म मृत्यूच्या या पावलांनी दोन।

विश्वाचे हें वन फिरु कैसें ॥६२॥ (फिरे आत्मा) दुसरीकडे असें आहे

 

विरोधी भावांनी विनटलेला जीव।

सांडितो न शीव संशायांची ॥

हंसे तोंडावरी - फांकलेलें दिसे।

अंतरी कांहिसे परी दु:ख ॥

समजल्या सत्यांचा कांही एक प्रांत।

वाटतो अज्ञात बुद्धिला या ॥

दोन जीवां मध्ये फुलेल्या प्रेमाला ।

वास केव्हा आला पूर्णतेचा ॥६३॥

 

हार जीत होई प्रसंगोपात्त जी।

असें चित्त राजी सदा तिला ॥

अभागी आशेचे किती करुणारव।

सुखें ऐकें जीव - जन्म जन्मीं ॥

केव्हा कां येईना - माझा भाग्य क्षण।

जरी गीत - गान चालतें हें ॥६४॥

 

आलें आस्ते आस्ते चक्र स्थिरावत।

एक एक पात दिसूं लागे ॥

विजेचा हा पंखा फिरे ना शेजारी।

तसेच अंतरी एक चक्र ॥

फिरकती थरथरा मनांत या वृत्ति।

परी त्यांची गति - क्षीणली आता ॥

स्तब्ध होतां वृत्ति संशयाचे वारे।

दूर गेले सारे - अचानक ॥६५॥

 

भावनांच्या तारा करुणारव फेंकिती।

चित्तास स्पर्शती - तुझ्या तेच ॥

आणि तेथे त्यांचा पडसाद जो उठे।

तयांना तूं कुठें लपवितेस ॥६६॥

 

लहानग्या मुळाला शक्ति जी जगवीते।

वृक्ष वाढवीते - थोर त्याचा ॥

फुलांनी फळांनी दि लादलेला।

ये त्यावरी घाला मृत्यूचा कीं ॥

मृत्यूचे कारण असे जीव शक्ति।

वर्धनांत होती दृश्य जी ती ॥

वृक्ष वाढला नी जरी मेला येथे।

फळांनी बीजांतें - सांडियेलें ॥

मेलेल्या वृक्षाच्या भोवतीं तें बीज।

नवे वृक्ष राज - करी सिद्ध ॥

मृत्यूनें न होतो जीवनाचा अंत।

परी शत गुणीत - होइ तेंच॥६७॥

 

निर्दोष जीवाला प्रेम कैंसे द्यावें।

गीत कैसे गावें पूर्णतेला ॥

सतेज दोष जे तयासाठी प्रेम।

मनी घेई जन्म - मानवांच्या ॥

गुणांनी आदर दोष योगे प्रेम।

वाढतो हा नियम सदासत्य ॥६८॥

 

विरोधा भासांच्या अलंकारी नटें।

तरी आम्हां परे - सत्य तत्व ॥

निर्भेळ सत्याची होणें न ओळख।

निखाऱ्यास राख पाहिजेच ॥

धर्मामध्ये दंभ - ढोंग तें नीतींत।

वासना प्रीतींत - सदा सिद्ध ॥६९॥

३०-१०-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search